रोहित पवार यांची टीका, फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटीवर का नाही ?

कर्जत जामखेड मतदार संघामधील एमआयडीसीचा मुद्दा मी अधिवेशनात मांडल्यानंतर आमचे विरोधक राम शिंदे जे झोपलेले असतात ते जागे होतात. उद्योग मंत्री यांच्यावर वरून फोन करून बैठक घेण्यासाठी सांगायला सांगतात केवळ बैठकी घेऊन राजकारण करण्याचं काम सध्याचे सरकार करत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी विधान भवनात प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, अधिवेशनात मी माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. असं सतत होतांना पाहायला मिळत आहे. यांना फक्त राजकारण करायचं आहे त्यामुळं आम्हाला बैठकीला बोलवलं नाहीं असे सांगितले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी भाजपा नेत्यांची एक बैठक पार पडली, त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस प्रचंड रागावले होते. त्यामुळं काल फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठीं भाजपाचे नेते मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडले होते. या माध्यमातुन टार्गेट दुसऱ्याच कुणाला तरी करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलल्यावर एसआयटी चौकशी केली जाते. मात्र, पेपरफुटी ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई होतं नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांचा यामागे हात आहे अशी खोचक टीकाही यावेळी केली.

रोहित पवार म्हणाले की, राजकिय षडयंत्र भाजपसोडून दुसरं कोणी करत नाही. नेत्याच्या विरोधात बोललं की एसआयटी लागते. पूर्ण देशात किंवा महाराष्ट्रात भाजपाला सत्ता येईल असं वाटतं नाही. त्यामुळे त्यांचे सातत्यानं दौरे वाढले आहेत. आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षण मुद्दा संसदेत सुटू शकतो. मात्र तिथं कुणी विषय काढत नाही. सध्या लोकं त्यांच्या बाजूने नसल्यामुळे भाजपा चिंतेत आहे असा उपरोधिक टोलाही लगावला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, १ लाख २० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ गुजरातमध्ये सापडले. महिन्याच्या अंतरात २ हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडत असतील तर हे गंभीर आहे असल्याचा सूचक आरोपही यावेळी केला.

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, चारच्या आसपास जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ नसेल, कारण तो शिवसेनेला जाणार आहे. अजित पवार हे दिलीप वळसे पाटील यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मागणी करत होते. मात्र, दिलीप वळसे पाटील कुणाचंच ऐकत नाहीत. शरद पवार याचं देखील त्यांनी ऐकलं नाही, असेही स्पष्ट केले.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *