भाजपा मनसेच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढविणार ? चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई: विशेष प्रतिनिधी

कोविडमुळे आणि राज्यातील सत्तांतरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा चांगलीच बदनाम झालेली असल्याने आगामी १३ महानगरपालिकेच्या निवडणूकां नजरेसमोर ठेवत भाजपाने नव्याने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून या रणनीतीचा भाग म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंज बंगल्यावर जावून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत राज्याचे नेतृत्व करावे अशी इच्छा व्यक्त केल्याने आगामी काळात भाजपा मनसेच्या नेतृत्वाखाली तर निवडणूक लढविणार नाही अशी कुजबुज राजकिय वर्तुळात सुरुवात झाली.

सध्या भाजपाकडून नवंनवे नेते निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून मराठा आरक्षण प्रश्नावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांची प्रभाव पडला नसल्याने अखेर खासदार संभाजीराजे यांना नव्याने पुढे आणण्यात आले. तसेच त्यांचे नेतृत्व स्थापित व्हावे याकरीता चंद्रकांत पाटील यांनीच काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचे नेतृत्व खा.संभाजीराजे यांनी पुढे येवून करावे असे आवाहन केले होते. अगदी त्याच धर्तीवर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या विरोधात नवा भिडू उभा करण्यासाठी चक्क मनसे प्रमुख राज ठाकरे यांना साद घातली आहे. त्या अनुषंगाने या दोन नेत्यांमध्ये चर्चाही झाली.

यासंदर्भात मनसेकडून जाहिर करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर सुमारे ५० मिनिटं चर्चा केली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना “विद्यार्थी चळवळीच्या दिवसांपासून राजसाहेब ठाकरे यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कोणत्याही प्रकारच्या स्वार्थासाठी आपल्या राजकीय विचारांना किंवा भुमिकांना मुरड घालण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ही जनतेच्या मनातली इच्छा मी त्यांच्यासमोर व्यक्त केली” असं चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण नेते म्हणूनच भेटलो. राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांप्रती असलेल्या भूमिकेच्या अनुषंगाने चर्चा करत जाणून घेतली. सध्या तर भाजपा मनसेबरोबर युती करून कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केलेले असले तरी भाजपाला राज्यात शिवसेनेच्या ठिकाणी नवा साथी हवा आहे. त्यादृष्टीनेच उध्दव ठाकरे ना सही तो राज ठाकरे सही अशा भूमिकेत भाजपा असल्याचे सध्याचे चित्र राजकिय वर्तुळात दिसून येत आहे. जर राज ठाकरे यांच्यासोबत युती करायची असेल तर ते दुय्यम भूमिका कधीही स्विकारणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढविण्याशिवाय भाजपाला पर्याय राहणार नसल्याचे मत एका ज्येष्ठ राजकिय क्षेत्रातील जाणकाराने व्यक्त केले.

About Editor

Check Also

ममता बॅनर्जी यांच्या गटाच्या उमेदवाराची माघार, इंडिया आघाडीच्या पाठिशी असल्याचे केले जाहिर नंदीग्राम पोट निवडणूकीत उमेदवार बनला विधानसभा विरोधी पक्षनेता

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी नंदीग्राम पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *