photo from UBC news from the university of British Colombia

अभियंता दिन विशेषः एआय आणि प्रत्येकातला अभियंता पदवी नव्हे, पाठ्यपुस्तक नव्हे, उष्मागतिकीची चार वर्षे नव्हेत तर केवळ कल्पकता

मानवाजवळ अशी एक पात्रता आहे, ज्याला पदवीची अट नाही, प्रवेशपरीक्षा नाही आणि किमान वयाची मर्यादाही नाही. ही पात्रता वर्गात शिकवता येत नाही; मानवाने मोठमोठी धरणे, जलवाहिन्या बांधल्या आणि सूक्ष्मचिपाही घडवल्या, रेल्वेजाळी आणि इंटरनेट विणले, अवजड पोलीदी याने आकाशात पाठवळी आणि सिलिकॉन कक्षेत मोडलेल्या वस्तूकडे पाहून ती दुरुस्त करणाऱ्या माणसाला, चालू असलेल्या वस्तूकडे पाहून ‘ही अधिक चांगली चालू शकेल का?’ असे विचारणाऱ्या माणसापासून वेगळी करणारी ही पात्रता म्हणजे कल्पकता  आणि अभियांत्रिकी अविष्कारांचे खरे मूळ कल्पकताच राहिली आहे.

पदवी नव्हे, पाठ्यपुस्तक नव्हे,  उष्मागतिकीची चार वर्षे नव्हेत तर केवळ कल्पकता.

अभियंत्यांच्या माध्यमातून मानवी प्रगतीचा प्रवास दोन वाक्यांत मांडता येईल.  आपण पाठीवर दगड वाहून नेण्यापासून ते स्वतःला वाहून नेणारी यंत्रे घडवण्यापर्यंत आलो. आणि मग आपण विचार करणारी यंत्रे देखील घडवली.  हे सर्व त्या त्या वेळच्या मानवाने अभियंत्यांच्या भूमिकेतूनच घडवले ना?

प्रत्येक वेळी आपल्याला पुढे नेणारा निर्णय कोणत्या समितीचा नव्हता, की कोणत्या संस्थेचा आदेश नव्हता. तो एक कल्पक माणूस होता. कोणत्यातरी शतकात, कोठल्यातरी ठिकाणी  ज्याने ‘जे आहे’ आणि ‘जे हवे’ यांमधली दरी पाहिली आणि ती दरी कायमची आहे हे मानण्यास नकार देवून परिस्थितीवर  कल्पकतेने विजय मिळविला. गरज ही नेहमीच शोधाची जननी राहिली आहे; पण त्या गरजेला साद देते ती कल्पकता.

प्रत्येक युगाची स्वतःची साधने होती. आणि ही साधने प्रत्येक वेळी बदलली, तेव्हा ‘अभियंता’ म्हणवण्यास पात्र असणाऱ्यांचे वर्तुळ विस्तारत गेले.

विसाव्या शतकाच्या मध्यावर संगणक आले, तेव्हा ते संस्थांच्या मालकीचे होते.  शासन विद्यापीठे, आणि संगणक चालवण्यासाठी ज्यांच्याकडे मोठमोठ्या जागा व आर्थिक स्त्रोत उपलब्ध होते, अशा कंपन्या/ संस्थांकडेच संगणक ही आधुनिक युगाची शक्ती होती. केवळ कल्पकता व बुद्धी असून भागत नसे, तर खोलीएवढे अजस्त्र यंत्रही लागत असे.

मग सूक्ष्मचिप (micro processors) आली. १९७० आणि ८०च्या दशकांत वैयक्तिक संगणक कंपन्या आणि संस्थांबरोबरच सर्वसामान्य व्यक्तीसाठी उपलब्ध झाले. क्युपर्टिनोच्या एखाद्या गॅरेजमधला किशोरवयीन मुलगा देखील कल्पकतेच्या आधरे ते घडवू शकत होता, ज्यासाठी पूर्वी अख्खा कॉर्पोरेट संशोधन-विभाग लागत असे. वर्तुळ विस्तारले. अभियंत्यांना आता व्यवस्थेच्या आत राहून काम करण्याची गरज उरली नाही  ते आपल्या खोलीतूनच व्यवस्था उभारू शकत होते.

पण त्या काळाबद्दलचे प्रामाणिक सत्य असे की, साधने निर्माण करणे व चालवण्यासाठी  अजूनही यंत्रांच्या भाषेवरील प्रभुत्व लागत असे. त्यांना कोडिंग यायला हवे होते. संगणक प्रणालींचे तर्कशास्त्र समजायला हवे होते. अभियांत्रिकीचे वर्तुळ मोठे झाले होते, पण त्याला अजूनही एक दरवाजाचा अडसर होता. आणि तो दरवाजा म्हणजे तांत्रिक साक्षरता.

कृत्रिम बुद्धिमत्ता आता हे दरवाज्यांचे अडसर बिजागऱ्यांसह उखडून टाकत आहे.

एआयची कथा बहुतेकांना वाटते त्याहून खूप जुनी आहे. १९५० साली ब्रिटिश गणितज्ञ ॲलन ट्युरिंग यांनी एक साधा प्रश्न विचारला: यंत्रे विचार करू शकतात का? त्यांनी एक कसोटी सुचवली  जर एखादे यंत्र माणसाशी अशा प्रकारे संवाद साधू शकले, की तो दुसऱ्या माणसाच्या संवादापासून वेगळा ओळखता येणार नाही, तर ते यंत्र विचार करते असे म्हणता येईल. ही कल्पना क्रांतिकारी होती. पण त्यावेळी जग या क्रांतीकारी कल्पकतेसाठी  तयार नव्हते.

सहा वर्षांनंतर, न्यू हॅम्पशायरमधील डार्टमथ महाविद्यालयातील एका उन्हाळी कार्यशाळेत, गणितज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या एका गटाने या क्षेत्राला नाव दिले. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कृत्रिम बुद्धिमत्ता  असे त्यांनी तिला संबोधले, आणि एका पिढीच्या आत हा प्रश्न बव्हंशी सुटेल असे भाकीत केले. मात्र त्यांचा अंदाज कैक पिढ्यांनी चुकला.

त्यानंतर उत्साह आणि पडझड यांची आवर्तने आली  इतिहासकार ज्यांना आज ‘एआयचे हिवाळे’ (AI winters) म्हणतात म्हणजे असा प्रतिकूल कालखंड, जेव्हा या तंत्रज्ञानाला दिलेली आश्वासने आपल्याला पाळता आली नाहीत आणि संशोधनाचा निधी आटला. १९९७ साली आयबीएमच्या ‘डीप ब्लू’ने बुद्धिबळाचा जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह याला पराभूत केले  तो एक ऐतिहासिक क्षण होता, पण ती प्रणाली केवळ बुद्धिबळापुरतीच बनवलेली होती.

खरा टर्निंग पॉईंट आला २०१२ साली, जेव्हा टोरोंटो विद्यापीठातील एका गटाने खोल चेतासंजाल (deep neural network) वापरून ‘इमेजनेट’ स्पर्धा  यंत्रदृष्टीचे एक आव्हान  इतक्या मोठ्या फरकाने जिंकली, की अख्खे क्षेत्र थक्क झाले. खोल-अध्ययनाचे (deep learning) युग सुरू झाले होते. यंत्रांना आता स्पष्ट नियम शिकवले जात नव्हते तर स्वत: माहितीतून शिकत होते.  मानवी मेंदू जसा असंख्य पुनरावृत्ती आणि सुधारणांतून आकृतिबंध ओळखतो, तशी.

मग २०१७ साली गूगलच्या संशोधकांनी ‘Attention Is All You Need’ नावाचा शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यात ‘ट्रान्सफॉर्मर’ रचनेची ओळख करून देण्यात आली  जीपीटी, जेमिनी, क्लॉड आणि त्यानंतरच्या प्रत्येक बृहद् भाषा-प्रारूपाला (large language model) चालना देणारे गणिती इंजिन. मागे वळून पाहता, तोच वात पेटवण्याचा क्षण होता.

नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटजीपीटी आले. ते पहिले भाषा-प्रारूप नव्हते, पण कोणालाही खरोखर वापरता येईल असे ते पहिले AI होते. याला तांत्रिक ज्ञानाची गरज नाही  फक्त भाषा पुरेशी होती. पाच दिवसांत त्याचे दहा लाख वापरकर्ते झाले. दोन महिन्यांत दहा कोटी. मानवी इतिहासात सर्वाधिक वेगाने स्वीकारले गेलेले तंत्रज्ञान म्हणून त्याचा विक्रम आजही कायम आहे.

हे सारे कोठे जाणार आहे? ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी जून २०२५ मध्ये ‘The Gentle Singularity’ (सौम्य विलक्षणबिंदू) नावाचा निबंध प्रसिद्ध केला. त्यात ते म्हणतात, की आपण एक उंबरठा आधीच ओलांडला आहे  इतक्या खोल परिवर्तनाचे प्रारंभिक टप्पे सुरू झाले आहेत, आणि तरीही रोजच्या जगण्यात ते आश्चर्यकारकरीत्या सामान्य वाटते. तंत्रज्ञानाची वाटचाल पाहणाऱ्या कोणालाही परिचित असलेला आकृतिबंध ते वर्णन करतात: चमत्कार प्रथम नित्याचे होतात, आणि मग किमान अपेक्षा बनतात. एआय एक परिच्छेद लिहू शकते या आश्चर्यापासून, तिने अख्खी कादंबरी लिहावी या अपेक्षेपर्यंत आपण आलो. एआयने केलेल्या वैद्यकीय निदानाच्या विस्मयापासून, ते त्याला उपचारांचा किमान दर्जा मानण्यापर्यंत.

याआधीच्या ‘Reflections’ नावाच्या निबंधात ऑल्टमन यांनी लिहिले, की “एजीआय  म्हणजे कृत्रिम सर्वसाधारण बुद्धिमत्ता, म्हणजेच माणूस करू शकेल असे कोणतेही बौद्धिक काम करू शकणारी प्रणाली  कशी घडवायची, हे आता ओपनएआयला ठाऊक आहे याचा त्यांना विश्वास आहे.” २०२५ मध्ये एआय एजंट कार्यशक्तीत (Workplace) मध्ये सामील होतील असे ते म्हणाले आणि कंपनीची महत्त्वाकांक्षा एजीआयच्याही पुढे  अतिबुद्धिमत्तेकडे (Super intelligence), त्यांच्या स्वतःच्या धाडसी शब्दांत ‘त्या तेजस्वी भविष्याकडे जाते, असेही त्यांनी नमूद केले.

हे दावे मोठे आहेत, आणि त्याबद्दल साशंकता आहे. एआयचा इतिहास उशिरा पूर्ण झालेल्या किंवा मुळात कधीच पूर्ण न झालेल्या  भाकितांनी भरलेला आहे. पण साशंक मंडळीही एका गोष्टीवर सहमत आहेत: आजच्या एआय प्रणालींची क्षमता याआधीच्या कशाहीपेक्षा गुणात्मकदृष्ट्या वेगळी आहे. आपण एआयच्या हिवाळ्यात (प्रतिकूल मोसमात नाही”. आपण एआयच्या उन्हाळ्यात (अनुकूल मोसमात )आहोत आणि तो थंडावण्याचे कोणतेही चिन्ह आता दिसत नाही.

आज, याच क्षणी काय शक्य आहे, याचा क्षणभर विचार करण्यासारखा आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या सहलीच्या खर्चापेक्षा कमी पैशांत जनुकसंच (genome) उलगडता येतो. रचनात्मक जीवशास्त्रज्ञांना दशके लागतील अशी प्रथिनांची संरचना ही गूगल डीपमाइंडने घडवलेल्या ‘अल्फाफोल्ड’च्या साहाय्याने काही तासांत वर्तवता येते. एखाद्या सॉफ्टवेअर अभियंत्याला लिहायला कित्येक दिवस लागतील असा कोड काही सेकंदांत तयार होतो. कायदेशीर दस्तऐवज, वैद्यकीय साहित्य, अभियांत्रिकी गणिते, वित्तीय प्रारूपे, कृषी निदान, स्थापत्य आराखडे  हे सारे, सोडवण्याजोगी समस्या असलेल्या कोणालाही, साध्या भाषेतल्या संवादातून घडवता, सुधारता आणि पक्के करता येते.

अभियांत्रिकीचा अंमलबजावणीचा स्तर  जो चालवायला वर्षानुवर्षांचे प्रशिक्षण लागत असे तो आता प्रत्येकाच्या हाती दिला गेला आहे.

आता केवळ उरतो तो भाग, जो शिकवायला नेहमीच सर्वांत कठीण होता आणि तो म्हणजे आपल्याला कोणती समस्या सोडवायची हे ओळखणे, आणि योग्य प्रश्न विचारण्याइतकी कल्पकता असणे.

२०२४ साली सिडनीतील पॉल कॉनिंगहॅम नावाच्या एका उद्योजकाला कळले, की त्याच्या रोझी नावाच्या कुत्रीला कर्करोग झाला आहे. रोझी ही आठ वर्षांची, भटक्या प्राण्यांच्या निवासस्थानातून  आणलेली कुत्री होती  तिच्या आजाराचे निदान होते ‘मास्ट सेल’ कर्करोगाचे म्हणजेच आक्रमक, आणि आधीच वापरून झालेल्या केमोथेरपी व शस्त्रक्रियेला दाद न देणारा आजार. यावर पशुवैद्यकांकउे पारंपरिक औषोधपचार नव्हते.

कॉनिंगहॅम डॉक्टर नाही, जीवशास्त्रज्ञही नाही तर तो विद्युत व संगणक अभियंता आहे.  यंत्र-अध्ययनातील सतरा वर्षांचा अनुभव असलेला, एआय खोलवर समजणारा, पण कर्करोगशास्त्र, प्रतिरक्षाशास्त्र (Immunity) किंवा औषधनिर्मितीचे कोणतेही प्रशिक्षण नसलेला माणूस. रोझीची अवस्था निराशाजनक आहे, हे मानायला त्याने नकार दिला.

त्याने चॅटजीपीटीला विचारले, की शास्त्रज्ञ वैयक्तिक कर्करोग-लशी कशा रचतात? त्याला चॅटजीपीटीकडून कळले, की याची गुरुकिल्ली उत्परिवर्तनांत (mutations) आहे — कर्करोगपेशींना निरोगी पेशींपासून वेगळे करणाऱ्या जनुकीय चुका. त्याने दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठांतील संशोधकांशी संपर्क साधला, स्वखर्चाने रोझीच्या निरोगी डीएनएचे आणि गाठीच्या डीएनएचे विश्लेषण करून घेतले, आणि मग तिच्या कर्करोगाला चालना देणाऱ्या विशिष्ट प्रथिनाचे प्रारूप ‘अल्फाफोल्ड’च्या साहाय्याने उभे केले. त्याने लक्ष्ये निश्चित केली. आपले निष्कर्ष त्याने यूएनएसडब्ल्यूच्या ‘आरएनए इन्स्टिट्यूट’मधील नॅनोवैद्यकाचे प्रणेते पॉल थोरडार्सन यांच्यासमोर ठेवले; त्यांनी कॉनिंगहॅमच्या एआय-निर्मित माहितीच्या आधारे खास बनवलेली एमआरएनए लस तयार केली. दोन महिन्यांच्या आत लस सज्ज होती.

मार्च २०२५ पर्यंत रोझीच्या पायावरची, टेनिसच्या चेंडूएवढी असणारी मोठी गाठ सुमारे ७५ टक्क्यांनी आकुंचित झाली होती. ती कुत्री पुन्हा सशांच्या मागे धावू लागली होती. हा एआय चॅटजीपीटीचाच चमत्कार आहे.

हा काही दशकभराच्या वैद्यकीय चाचण्यांनंतर एखाद्या औषध कंपनीने रचलेला इलाज नव्हता. मरणासन्न अवस्थेतील रोझी, जनुक-विश्लेषणासाठी क्रेडिट कार्डचा आर्थिक स्त्रोत असलेल्या, आणि एआयला योग्य क्रमाने योग्य प्रश्न विचारण्याची कल्पकता असलेल्या एका माणसाने तो अभियांत्रिकी इतिहास रचला होता. मॉडर्ना आणि मर्क या वैद्यकीय औषध संशोधन कंपन्या ज्यासाठी मानवी रुग्णांच्या बाबतीत अब्जावधी डॉलर खर्चत आहेत, त्याचे प्राथमिक प्रारूप कॉनिंगहॅमने आपल्या कुत्रीसाठी काही महिन्यांतच चॅटजीपीटीच्या मदतीने उभे केले.

त्याच्याकडे जीवशास्त्राची पदवी नव्हती तर त्याच्याकडे होते केवळविषयाचे ज्ञान, जिज्ञासा आणि साधने.

कॉनिंगहॅमची कथा असामान्य आहे. पण तिच्यामागचे तत्त्व कितीतरी अधिक सामान्य ठिकाणी उलगडत आहे  आणि कदाचित तेच अधिक महत्त्वाचे आहे.

आपल्या मातीबद्दल तीस वर्षांचे ज्ञान असलेल्या भारतीय शेतकऱ्याचा विचार करा  वेगवेगळ्या पावसाळ्यांत मातीचा पोत कसा बदलतो, शेताच्या पूर्वेकडचा भाग उर्वरित शेतापेक्षा हळू का निथळतो, कोणत्या पावसानंतर कोणती कीड येते. दशकानुदशके साचलेले आणि पिढ्यान्‌पिढ्या पुढे गेलेले हे ज्ञान भारतीय शेतीचचा आत्मा राहिले आहे. मात्र याला कमतरता होती ती जागतिक कृषि संसाधनाचा दुवा साधण्याची. उपग्रह-माहिती, हवामान-प्रारूपे, बाजारपेठेचे संकेत; जे अस्तित्वात होते, पण एकत्र करून शेतकऱ्याच्या हातात कधीच ठेवले गेले नव्हते. याचा दुवा साधला गेला नव्हता.

‘किसान जीपीटी’ने ते चित्र बदलले. २०२३ साली भारतात सुरू झालेले हे एआय चॅटबॉट खास अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बनवलेले आहे  सिंचन, कीड-नियंत्रण आणि पीक-वेळापत्रकाबाबत मार्गदर्शन करणारे, आणि साक्षरता ही अडचण ठरू नये म्हणून आवाजातून विचारलेले प्रश्नही स्वीकारणारे. शेतकरी जेव्हा त्याला आपल्या शेताबद्दल विचारतो, तेव्हा तो आपला शतकांचा अनुभव सोडून देत नसतो. तो त्याला अधिक बळ देत असतो. एआय साचेबध्दता आणते तर शेतकरी मानवी जाण आणतो. दोघे मिळून असा निर्णय घडवतात, जो त्यांच्यापैकी एकालाही एकट्याने गाठता आला नसता.

शेतकऱ्याला आपण परंपरेने अभियंता म्हटलेले नाही. पण विश्वसनीय आणि सुधारित परिणाम मिळवण्यासाठी एका गुंतागुंतीच्या, बदलत्या समस्येवर पद्धतशीर ज्ञान वापरणे  याखेरीज तो दुसरे काय करत असतो? बदलले आहे इतकेच, की साधने आता त्याच्या आवाक्यात आली आहेत.

यानंतर येतात उद्योजक.  ज्यांच्या उत्तम कल्पना वर्षानुवर्षे तांत्रिक अंमलबजावणीच्या भिंतीमागे अडकून पडल्या होत्या.

ती भिंत खरी होती. सॉफ्टवेअर घडवायला डेव्हलपर लागत. डेव्हलपर नेमायला भांडवल लागे. भांडवलासाठी गुंतवणूकदार लागत. गुंतवणूकदारांना पुरावा लागे. हे चक्र दुष्ट होते, आणि हे द्वारपालन बहुधा अदृश्य असे  दुष्ट हेतूने नव्हे, तर रचनेमुळे. तांत्रिक सहसंस्थापक नसलेल्या, किंवा लाखभर डॉलरची शिदोरी नसलेल्या माणसाकडची कितीही तेजस्वी व्यावसायिक कल्पना उत्पादनात रूपांतरित होण्याची शक्यता अत्यल्प होती.

ते चक्र आता मोडले आहे. आज एखाद्या मालवाहतूक दलालाचे, परिचारिकेचे, शाळेच्या मुख्याध्यापकाचे किंवा कापड व्यापाऱ्याचे ज्ञान  जे केवळ घडवणारा माणूस उपलब्ध किंवा परवडणारा नव्हता म्हणून कधीच सॉफ्टवेअरमध्ये उतरले नाही  ते आता चालत्या-बोलत्या उपयोजनात (application) रूपांतरित होऊ शकते. समस्या सर्वांत खोलवर समजणारा माणूस आता उपाय घडवण्यास सक्षम आहे. परिपूर्णपणे नाही. पुन्हापुन्हा सुधारणा केल्याशिवाय नाही. पण सक्षम आहे.

ज्यासाठी पूर्वी विकसकांचा गट आणि सहा-सहा महिने लागत, ते आज विषयाचे ज्ञान, एक लॅपटॉप आणि महिन्याला एआयसाठी काहीशे रुपये वगर्णी असलेला एकच माणूस घडवू शकतो. अडथळा कधीच बुद्धिमत्तेचा नव्हता. तो तेथे मिळण्याचा होता.

आपण एका दुर्मीळ वळणावर उभे आहोत. साधने इतक्या मूलगामी वेगाने बदलली आहेत, की समस्या कोण सोडवणार  कोणाला अभियंता म्हणायचे  याची व्याख्या डोळ्यांदेखत नव्याने लिहिली जात आहे.

पण जे बदललेले नाही, ते हे: साधने प्रश्न विचारत नाहीत. ती दरी ओळखत नाहीत. रोझीचा कर्करोग लढण्याजोगा आहे, किंवा शेताची पूर्व बाजू हळूहळू निथळते, किंवा दख्खनच्या पठारावरून मालवाहतुकीचा अधिक चांगला मार्ग असलाच पाहिजे  असे ती ठरवत नाहीत. त्यासाठी अजूनही असा माणूस लागतो, ज्याने अडचणींचा मागोवा घेतला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्यास नकार दिला. त्यासाठी कल्पकता लागते.

अभियांत्रिकी ही मुळात उपयोजित कल्पकतेची (applied ingenuity) साधना आहे केवळ पदव्या किंवा पात्रतेची नाही. पदवी हे कठोर शिस्त, पद्धतशीर विचार आणि कोणत्याही प्रकारचा अंदाज न बांधता समस्येचे उपायात रूपांतर करण्याच्या क्षमतेचे एक निदर्शक मानले जात असे. एआय मुळे ही कठोर शिस्त किंवा विचारपद्धती बाद होत नाही; उलट, योग्य प्रश्न विचारणाऱ्या कोणालाही ती मागणीनुसार उपलब्ध करून देणारी एक पायाभूत सुविधा म्हणून ‘एआय’ काम करते.

ज्यांची जयंती आपण आज साजरी करत आहोत, ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे उपजतच जाणत होते. साधने येण्याची वाट पाहत ते थांबले नाहीत. गरजेची साधने अस्तित्वात नव्हती, तेव्हा त्यांनी ती स्वतः घडवली मुसी नदीच्या पुराचे पाणी नियंत्रित करणारे स्वयंचलित दरवाजे, आणि कृष्णराजसागर धरण शक्य करणारी खंडशः सिंचनाची पद्धत. ते अभियंते होते, ते त्यांच्या पदामुळे किंवा संस्थेमुळे नव्हे; तर उपाय मागणारी समस्या त्यांना दिसली, आणि तो उपाय घडवण्याची कल्पकता त्यांच्याकडे होती म्हणून.

तोच गुण दरी स्वीकारण्यास नकार देण्याची तीच वृत्ती एआय आज अवघ्या मानवजातीत विस्तारत आहे.

आज कोणीही अभियंता होऊ शकतो. साधने इथे आहेत. ज्ञान उपलब्ध आहे. अंमलबजावणीचा स्तर खुला आहे.

उरली आहे ती फक्त तीच गोष्ट, जी घडवणे नेहमीच सर्वांत कठीण होते: सुरुवात करण्याची कल्पकता.

 

लेखक-आदित्य सुवर्णा सुदिन गायकवाड

 यंग प्रोफेशनल, महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA)

About Editor

Check Also

बांग्लादेश मुक्तिसंग्राम नेते शेख मुजीबुर रहमान यांची छायाचित्रे हटवून त्याजागी मोहम्मद अली जीना यांची चित्रे विद्यार्थी संघटनांकडून निषेध

ढाका विद्यापीठाच्या ‘सेंट्रल स्टुडंट्स युनियन’ (DUCSU) संग्रहालयात बांग्लादेशचे मुक्तिसंग्राम नेते शेख मुजीबुर रहमान यांची छायाचित्रे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *