सोनम वांगचुक यांची माहिती, उपोषणाचे आंदोलन यापुढेही सुरु राहणार आंदोलकांवरील लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर आणि खासदाना भेटण्याची परवानगी मिळेपर्यंत उपोषण सुरुच

नीट-यूजी पेपरफुटीचा निषेध करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांना खासदारांना भेटण्याची परवानगी मिळेपर्यंत किंवा सध्या दाखल असलेल्या दिल्लीतील रुग्णालयात खासदारांनी त्यांची भेट घेईपर्यंत, आपण आपले अनिश्चित काळासाठीचे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सोमवारी सांगितले.

त्यांची पत्नी गीतांजली आंग्मो यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका हस्तलिखित चिठ्ठीत, सोनम वांगचुक यांनी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) या उपहासात्मक राजकीय पक्षाच्या बॅनरखाली निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा व्यक्त केला आहे. हा पक्ष कथित परीक्षा अनियमिततेवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे.

सोनम वांगचुक आपल्या संदेशात “मी माझा उपोषणाचे आंदोलन सुरू ठेवणार आहे (दिवस २३). शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी ज्या क्रूरतेने वागले जात आहे, ते पाहता, जोपर्यंत युवा नेत्यांना संसद भवनात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही किंवा मला येथे रुग्णालयात त्यांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी माझे उपोषणाचे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला,” असे स्वाक्षरी केलेल्या पत्रात लिहिले आहे.

त्यांनी आशा व्यक्त केली की, सरकार “शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित करेल” आणि त्यांनी वर्णन केलेल्या चिथावणीनंतरही शांतता राखल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सोनम वांगचुक म्हणाले की, चिथावणी देऊनही तरुणांनी ज्या प्रकारे शांतता राखली आहे, ते पाहून मी भारावून गेलो आहे आणि मी सरकार व पोलिसांना आवाहन करतो की, विद्यार्थ्यांना आज किंवा उद्या संसदेसमोर त्यांच्या तक्रारी मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवावा,अशी मागणीही यावेळी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिल्ली पोलिसांनी संसदेकडे मोर्चा नेणाऱ्या हजारो आंदोलकांना रोखल्यानंतर काही तासांनी सोनम वांगचुक यांचे हे वक्तव्य आले आहे. कथित नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची आणि प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला.

त्यानंतर, पोलिसांनी जंतर मंतर येथील सीजेपीच्या आंदोलनस्थळी कारवाई केली. सोनम वांगचुक जिथे उपोषण करत होते तो मंच, तसेच गाद्या, सतरंज्या आणि इतर साहित्य पोलिसांनी हटवले.

या कारवाईनंतरही, आंदोलक जंतर मंतर येथे पुन्हा एकत्र जमले आणि त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी लाऊडस्पीकर लावलेल्या वाहनातून समर्थकांना संबोधित केले, तर एका आंदोलक नेत्याने दावा केला की एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. मात्र, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.

सीजेपीने ६ जून रोजी जंतर मंतर येथे एक दिवसीय निदर्शनाने सुरुवात केली आणि नंतर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सफदरजंग रुग्णालयाकडून सोनम वांगचुक यांचे नवीनतम पॅथॉलॉजिकल अहवाल आणि आरोग्य बुलेटिन मागवले असून, त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यास परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय मंगळवारी घेतला जाईल असे सांगितले.

सरन्यायाधीश डी. के. उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सफदरजंग रुग्णालयाला सोनम वांगचुक यांचे नवीनतम वैद्यकीय अहवाल रेकॉर्डवर ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एम्समधील डॉक्टरांना आणि यापूर्वी त्यांच्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांना सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्यास सांगितले. न्यायालयाने आंग्मो यांना त्यांच्या विनंतीनुसार खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या रक्त तपासणीचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

सफदरजंग रुग्णालयात सोनम वांगचुक यांच्या उपचारात हस्तक्षेप करण्यास नकार देणाऱ्या एकल न्यायाधीशांच्या आदेशाला गीतांजली आंग्मो यांनी आव्हान दिले आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांचे पती अटकेत नसतानाही त्यांना प्रभावीपणे सरकारी रुग्णालयात डांबून ठेवले जात आहे आणि त्यांच्या स्वतःच्या वैद्यकीय उपचारांबद्दल निर्णय घेण्याच्या अधिकाराशी तडजोड केली जात आहे.

रविवारी, एकल न्यायाधीशांनी असे मत मांडले होते की, उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात हलवणे प्रशासनासाठी योग्य होते आणि डॉक्टरांनी वैद्यकीय नियमांनुसार त्यांच्यावर देखरेख सुरू ठेवावी, असे निरीक्षण नोंदवले होते.

दिल्ली पोलिसांनी सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान गीतांजली आंग्मो यांना मारहाण करण्यात आली आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे केस ओढले, हे सोशल मीडियावर केलेले दावेही फेटाळून लावले आहेत. एका निवेदनात, पोलिसांनी हे आरोप “पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे” असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीवर लक्ष्यित हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट करत, त्यांनी बळाचा हेतुपुरस्सर वापर केल्याचे दावे निराधार असल्याचे सांगितले.

स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि नीट (NEET) वादाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ वांगचुक २८ जूनपासून अनिश्चित काळासाठी उपोषणावर आहेत. परीक्षा-संबंधित मुद्द्यांवर अधिक उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या विद्यार्थी आणि युवा गटांच्या नेतृत्वाखालील देशव्यापी आंदोलनाच्या केंद्रबिंदूंपैकी हे एक बनले आहे.

About Editor

Check Also

पोलिसांचा सीजेपीच्या आणि तरूणांच्या आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या संसदेच्या प्रवेशद्वारावर सीजेपीचा मोर्चा धडकला

नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *