मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ वापर मंत्रालयातील सुरक्षेसाठी करा मंत्रालय सुरक्षेचा घेतला आढावा

राज्याच्या काना- कोपऱ्यातून कामाच्या पूर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा अबाधित देखील अबाधित रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडेपर्यंतची व्यवस्था कार्यरत करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रालयातून विधान भवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी जात असतात. अधिवेशनादरम्यान तर विधान भवन ते मंत्रालय वर्दळ वाढलेली असते. विधान भवनात नियमित कार्यालयीन कामासाठी जात असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना सर्व ठिकाणी प्रवेश असलेले सुरक्षा पासेस देण्यात यावेत. मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या भुयारी मार्गाद्वारे विधान भवनात जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश उपलब्ध करून द्यावा, असे निर्देशही दिले.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचे काम पूर्ण करावे. काम पूर्ण झाल्यावर मध्यभागी लावलेले सुरक्षा जाळे काढून टाकण्याची कार्यवाही करण्यता यावी. मंत्रालय प्रवेशद्वारावर वस्तू व साहित्याची चोख तपासणी करण्यात यावी. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू व साहित्य मंत्रालयात येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी दिल्या.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *