घड्याळ चिन्हावरून शरद पवार आणि अजित पवार गटात जुंपली

लक्षद्विपचे विद्यमान खासदार फैजल यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली. तसेच मागील निवडणूकीतही फैजल यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित विजय मिळविला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात घड्याळ चिन्हाबाबत निर्णय दिला आहे. त्यामुळे फैजल यांच्याशिवाय घड्याळ चिन्ह दुसऱ्यांना मिळणार नाही अशी माहिती जयंत पाटील यांना त्यांच्या पक्ष कार्यालयात नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती.

त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना ‘घड्याळ’ हेच चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये अशी विनंती अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आनंद परांजपे म्हणाले की, टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करायचा असतो असे शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते बोलतात. पण खोडसाळपणे चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला गेल्यावर ‘इनकरेक्ट’ कार्यक्रमच होतो हे ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात ठेवावे असा टोलाही जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्र आणि नागालॅंडमध्ये मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष असून पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. अरुणाचल प्रदेश येथे होणाऱ्या विधानसभेच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. त्याचप्रमाणे लक्षद्वीप येथे होणार्‍या लोकसभेच्या निवडणूकीत उमेदवारांना ‘घड्याळ’ हेच चिन्ह मिळणार आहे. तशाप्रकारची अधिसूचना २३ मार्च रोजी अरुणाचल प्रदेशबद्दल निवडणूक आयोगाने काढली आहे आणि लक्षद्वीपबद्दल २४ मार्च रोजी अधिसूचना काढण्यात आली हेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

शेवटी बोलताना आनंद परांजपे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमध्ये आणि लक्षद्वीपमध्ये लोकसभा निवडणुकीत घड्याळ हेच चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज माध्यमांनीही पसरवू नये असे आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक महसूल विभागाकडून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश

आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठीच्या प्रकरणांचा कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत निपटारा होणे बंधनकारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *