मराठी जनांच्या लढ्यामुळे राज्य सरकारने हिंदी सक्तीवरून माघार घेतली. त्याप्रित्यर्थ्य आज मराठी जनांच्या लढ्याच्या विजयानिमित्त विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षानंतर या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आले. यावेळी सुरुवातीला राज ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपा आणि मिंदे गटाच्या एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच फैलावर घेतले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आणि राज ठाकरे अनेक वर्षानंतर व्यासपीठावर पहिल्यांदा एकत्र आलो. आम्ही एकत्र आलो ते यापुढेही एकत्र राहण्यासाठी. त्यामुळे राज याने भाषण केल्यानंतर माझ्या भाषणाची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. काही आम्ही इथे एकत्र दिसणं हेच आजच्या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने अनेकांसाठी महत्वाचं आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांचा आज मी व्यासपीठावर सन्मानिय राज ठाकरे म्हणून उल्लेख करतो, कारण त्यांचे कर्तृत्व आणि त्यांचे काम आपण सर्वांनी आतापर्यंत पाहिले आहे. त्यामुळेच सन्मानिय राज ठाकरे असा उल्लेख करत असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना वापरलतं आणि फेकून दिलत, पण यावेळी आम्ही तुम्हाला उचलून फेकून देणार असल्याचा स्पष्ट इशारा भाजला देत पुढे म्हणाले की, भाजपावाले अफवा पसरविण्यात सगळ्यात आघाडीवर असतात. मध्यंतरी त्यांनी अफवा पसरवली की उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडलं. पण आम्ही देशभक्त हिंदूत्ववादी आणि कर्मठ हिंदू आहोत. तुम्ही आता म्हणायला लागला आहात जय श्रीराम, पण आमच्याकडे यापूर्वीच संत रामदास स्वामी राम राम म्हणणारे होऊन गेलेत. तसेच आमच्या कडे मारूती स्त्रोत पूर्वीपासून आहे, तुम्ही आता हनुमान चालिसा म्हणायला लागला आहात. त्यामुळे आम्हाला हिंदूत्व आणि देशभक्ती आम्हाला शिकण्याची गरज नाही असेही यावेळी भाजपाला ठणकावून सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला २०-२५ वर्षापूर्वी भाजपावाले तुम्हाला महाराष्ट्रात कोणी ओळखत तरी होतं का असा सवाल करत तुमच्या डोक्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात होता म्हणून ओळखायला लागले. नाही तर महाराष्ट्रात कोणी ओळखलं तरी असता का असा उपरोधिक सवाल करत केला.
हिंदी भाषा आणि हिंदी भाषिकांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. इतकेच काय अनेक उत्तर भारतीय लोक मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने येतात आणि इथल्या मातीचे होऊन जातात. भाषेमुळे काय काय निर्माण होतं हे तुमच्यापेक्षा आम्हाला चांगलं माहित आहे. त्यामुळे आम्हाला भाषेचे महत्व सांगू नका असा इशारा देत आम्ही सगळ्या भाषेचा आदर करतो पण भाषेची सक्ती कराल तर आम्ही शक्ती दाखवू असा सज्जड दमही यावेळी भाजपाला दिला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तो कोण केडिया की भेडिया आहे तो इतक्या बेमुवूर्तपणे मराठी भाषेबद्दल बोलता. असले भेडियाच भाजपावाल्यामुळे निर्माण आहेत अशी टीका करताना भाजपावाले सध्या म्हणतायत की, आम्ही महापालिकेसाठी एकत्र आलो आहे. पण आम्ही नुसतेच महापालिकेसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी एकत्र आलो असल्याचेही यावेळी सांगितले.
मुंबई ही आपण हुताम्यांचे बलिदान मिळवली. पण या मुंबईतील सर्वाधिक जमिनीची मालकी सध्या कोणाकडे आहे तर त्यांच्या दिल्लीतील मालकांच्या मित्राची. इथल्या जमिनींची मालकी कोणाची आहे, हे न बघता भाजपावाल्यानी त्यांच्या मालकाच्या मित्राला मुंबईची मालकी भराभर देऊन टाकल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर करत आता मध्येच यांच्याकडून सुरु झालंय वन नेशन वन इलेक्शन, का तर देशांत यांना सगळीकडे एक एक हवंय. आता ह्यांनी एक एक करत सगळीकडे एकच घाण करून ठेवली आहे. सध्या देशाचे पंतप्रधान तिकडे घाणा देशात गेलेत, इथे घाण आणि ते तिकडे घाना ऑफ स्टार झाले आहेत अशी उपरोधिक टीकाही मोदी यांच्यावर यावेळी केली.
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका करताना म्हणाले की, दिल्लीत ते दोन बसलेले दोन दाढीतले राजकारणी व्यापारी बसलेले आहेत, त्यां दोघांचे गुलाम राज्यातल्या सत्तेवर आहेत. त्यांच्या मालकाच्या मित्राला काय पाहिजे ते देण्याचं काम ते सध्या करत आहेत. त्यांनी आपल्यातच गद्दार निर्माण करून आपल्यातच भांडणे लावली. पण आता अशा पद्धतीची भांडणं थांबवायला पाहिजे. काल तर एक गद्दार त्यांच्या मालकाला खुष करण्यासाठी जय गुजरात असे बोलून गेला एका कार्यक्रमात. मालकाला खुष करण्यासाठी किती लाचारीपणा अशी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याच्या गुलामांच सरकार काही अडचणीचे प्रश्न आले की, हे उद्धव ठाकरे सरकारच्या काळातलं म्हणून सतत आमच्या सरकारच्या नावावर खपवत होतं. आमच्या सरकारच्या काळातच राज्यात मराठीची सक्ती केली आणि त्याची अंमलबजावणीही सुरु केली. पण या गुलामांच्या सरकारने हिंदी सक्तीचा विडा उचलला आहे. जी काही चांगली काम आमच्या सरकार करत होते तर आमच्यात गद्दारी घडवून का आणली आमचं सरकार का पाडलं असा सवालही यावेळी केला.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या काळात येणारे सगळे उद्योग ते सत्तेत आल्यानंतर सगळं गुजरातला पळवून लावले. इथे होऊ घातलेली केंद्रेही पळवून लावली आता म्हणून ही गद्दार जय गुजरात म्हणायला लागली आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराचा सच्चा माणूस जय गुजरात म्हणेल का असा सवाल करत ही गुलाम आहेत अशी खोचक टीकाही यावेळी केली.
Marathi e-Batmya