पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. संसदेच्या इतिहासात असे प्रथमच घडले असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सभागृह पूर्ण क्षमतेने उपस्थित होते. दरम्यान संपूर्ण अधिवेशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने विद्यार्थ्यांच्या विरोधात वापरण्यात आलेल्या लाठीचार्ज, पॅलेट गन आणि एक ४७ रायफलचा वापर आदीवरून अमित शाह यांना धारेवर धरले. मात्र मागील १९-२० दिवस अमित शाह हे सभागृहात कामकाजात सहभागी झालेच नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून विरोधकांना अर्थात देशाला उत्तर मिळाले नाही. परंतु आज संसद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अमित शाह हे उपस्थित राहिले. परंतु विरोधकांकडून गोंधळ सुरु होण्यापूर्वीच राष्ट्रगीताचे सहा कडवे सादर झाल्यानंतर, लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आणि अधिवेशन समाप्त झाले.
दरम्यान, राज्यसभेचे कामकाजही राष्ट्रगीताने अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘वंदे मातरम’ला कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांनी ही घडामोड घडली आहे. या कायद्यानुसार, राष्ट्रगीत गाण्यात हेतुपुरस्सर व्यत्यय आणणे किंवा त्याला प्रतिबंध करणे हा शिक्षेस पात्र गुन्हा ठरतो, ज्यामुळे त्याला
राष्ट्रगीताच्या समान कायदेशीर दर्जा प्राप्त होतो. सरकारने यापूर्वी शासकीय कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत गाण्यासंबंधी नियमावली जारी केली होती.
२८ जानेवारी रोजीच्या एका आदेशात, केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींचे आगमन, तिरंगा फडकवणे आणि राज्यपालांचे अभिभाषण यांसारख्या प्रसंगी गीताचे सहा कडवे गायले जावेत असे निर्देश दिले. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वारंवार होणारे व्यत्यय आणि तीव्र शाब्दिक चकमकीनंतर लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नेहमीचे समारोपाचे भाषण वाचले नाही, ज्यात ते अधिवेशनादरम्यान लोकसभेच्या कामगिरीचा आणि कार्यक्षमतेचा आढावा घेतात. २० जुलै रोजी अधिवेशन सुरू झाल्यापासून, नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर झालेली पोलीस कारवाई आणि राम मंदिराच्या देणगी चोरीच्या प्रकरणासारख्या मुद्द्यांवरून कामकाज वारंवार थांबले आहे.
बुधवारी अमित शाह म्हणाले होते की, ते चर्चेसाठी तयार आहेत आणि विरोधी पक्षाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतील. त्यांनी अध्यक्षांना विरोधी पक्षाशी सल्लामसलत करून विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चेसाठी वेळ देण्याचे आवाहनही केले होते.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षाने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संसद संकुलातील मकर द्वार येथे भाजप आणि विरोधी पक्षांनी केलेली परस्परविरोधी निदर्शने, अधिवेशनादरम्यान दिसून आलेल्या तीव्र मतभेदांवर प्रकाश टाकणारी ठरली.
झारखंडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनप्रकरणी काँग्रेस अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने राहुल गांधींविरुद्ध निदर्शने केली, तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी आपल्या मागण्यांवर आक्रमक भूमिका घेत अमित शाह यांच्यात आता धाडस नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नी उत्तर देण्याचा दम नसल्यानेच ते सभागृहात उपस्थित रहात नसल्याची टीका केली.
Marathi e-Batmya