आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस अत्यंत राक्षसी पद्धतीने वागत आहेत. मुलांना ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्यानंतर आता दादरमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्यापर्यंत फडणविसांच्या पोलिसांची मजल गेली आहे. तरुण मुलांवर लाठीहल्ला केला जात आहे. विद्यार्थ्यांवर दडपशाही करणारे पोलीसराज महाराष्ट्राला कलंक असून स्वतःला देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र दुर्योधनासारखी असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आपल्या लेकीबाळींच्या अंगाला पोलीस हात घालत असताना मुख्यमंत्र्यांना चिड येत नसेल, त्याची लाज वाटत नसेल तर असा मुख्यमंत्री लाभणे हे राज्याचे दुर्दैवी आहे. अण्णा हजारे आता जागे झाले आहेत पण देवेंद्र फडणवीस अजून जागे झालेले नाहीत. मुला मुलींवरील अत्याचाराप्रकरणी पोलिसांचे जे स्पष्टीकरण येत आहे ते योग्य नाही, लाज वाटणारे आहे. मुलांना धमकावणाऱ्या पोलिसाला निलंबित केले तर पोलिसांकडून चालवले जाणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड होईल म्हणून कारवाई केली जात नाही का? नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना कोणतीही संवेदनशिलता राहिली नाही, अशी टीकाही यावेळी केली.
ठाकरेंच्या मार्चाबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोणतीही लोकशाही, संविधान मानणारी संघटना व पक्ष मोर्चा काढत असेल तर त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबाच असेल. काँग्रेस पक्षाने आजपासून राज्यभर गावोगावी आंदोलन सुरु केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांचा राजीनामा होत नाही आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे, असेही सांगितले.
Marathi e-Batmya