भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपकडून वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकचे मंत्री बी नागेंद्र यांनी शुक्रवारी संध्याकाळी डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची घोषणा करताना अश्रू ढाळले. आपला निर्णय जाहीर करताना नागेंद्र यांनी दावा केला की, ते दलित असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे.
मंत्री बी नागेंद्र पुढे बोलताना म्हणाले की, वाल्मिकी व्यवहारात माझी सही कुठे आहे का? मला दलित म्हणून लक्ष्य केले जात आहे, असे म्हणाले. या कथित व्यवहारांमध्ये बँका सामील असताना आपल्यालाच का जबाबदार धरले जात आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आणि मग केंद्रीय अर्थमंत्री जबाबदार आहेत का? असेही विचारले. ते पुढे म्हणाले, कर्नाटकची जनता पाहत आहे. दररोज माझ्या विरोधात हजारो खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत.
बी नागेंद्र यांची ही घोषणा अशा वेळी आली आहे, जेव्हा भाजप आणि जेडी(एस) कडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरत आहेत. महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळाच्या निधीच्या कथित गैरवापराशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असून, कर्नाटक विधानसभेच्या आत आणि बाहेर निदर्शने केली जात आहेत.
भाजप आणि जेडी(एस) यांनी बी नागेंद्र यांना मंत्रिमंडळातून हटवण्याच्या मागणीसाठी १ ते १० सप्टेंबर दरम्यान रायचूर ते बल्लारी पायी मोर्चाची घोषणा केली आहे.
मे २०२४ मध्ये महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळात तत्कालीन लेखा अधीक्षक पी. चंद्रशेखरन यांनी आत्महत्या केल्यानंतर हा वाद निर्माण झाला. त्यांनी महामंडळाच्या निधीतील अनियमितता आणि अनधिकृत हस्तांतरणाचे आरोप करणारी सहा पानी चिठ्ठी मागे ठेवली होती.
त्यानंतरच्या तपासात असे आढळून आले की, ८९.६३ कोटी रुपये महामंडळाच्या खात्यातून युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आणि त्यानंतर ते इतर अनेक खात्यांमध्ये हलवण्यात आले, ज्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला.
जेव्हा हा वाद समोर आला तेव्हा बी नागेंद्र आदिवासी कल्याण मंत्री होते आणि त्यांनी जून २०२४ मध्ये मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. ३ ऑगस्ट २०२६ रोजी नियोजन आणि सांख्यिकी खाते देऊन त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आले, ज्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी पुन्हा केली.
बी नागेंद्र यांनी यापूर्वी राजीनामा देणार असल्याच्या वृत्तांचे खंडन केले असून, आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. त्यांनी असेही म्हटले की, त्यांना “मनुवादीं”चा सामना करण्याची तयारी करायची आहे, जो स्पष्टपणे भाजपचा संदर्भ होता.
Marathi e-Batmya