मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार ‘फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी: बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया’ पुस्तकाचे प्रकाशन

झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. मात्र आम्ही फक्त मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा देऊन तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळवून देऊन त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले प्रयत्न आणि त्याअनुषंगाने झालेले निर्णय या संपूर्ण प्रक्रियेवर सीएफएसडी (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) च्या लीना बुद्धे यांनी लिहिलेल्या ‘फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी: बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘रामगिरी’ येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

झोपडपट्टीतील रहिवाशांना मालकीपट्टे मिळणे अतिशय आवश्यक होते. ते दिल्यामुळे त्यांचे जीवन बदलल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांचा सर्वसमावेशक विकास होण्याच्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. झोपडपट्टी विकासासाठी हे पुस्तक दिशादर्शक असणार आहे. मी नागपूरचा महापौर असतानाच या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यामुळे पुढे आमदार म्हणूनही हा विषय लावून धरला. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या या पुस्तकाच्या लेखिका लीना बुद्धे यांनीही हा गुंतागुंतीचा विषय अभ्यासपूर्ण मांडला. मुख्यमंत्री झाल्यानंतर मालकी पट्टे देण्याचा मी निर्णय घेतला. अनेक खासगी जागांवरही झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यांच्या नियमितीकरणासाठीही शासनाने निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेचे या पुस्तकामुळे दस्तावेजीकरण झाले आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी लेखिका श्रीमती बुद्धे यांचे अभिनंदन केले.

नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याची भावना लेखिका लीना बुद्धे यांनी मनोगतात व्यक्त केली. झोपडपट्टीधारकांचा प्रश्न हा अतिशय जुना आहे. तो फार कोणी समजून घेतला नाही, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यासाठी मदतीचा हात पुढे करून ठोस निर्णय घेतले. त्यामुळे मालकी हक्क मिळण्याचा मोठा आनंद त्या रहिवाशांना मिळू शकला. हा सारा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. नागपूर शहरात १२ ते १५ हजार अशा मालकीपट्ट्यांचे वाटप करण्यात आले आहे. हे खूप मोठे कार्य असल्याचे लीना बुद्धे यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, डॉ. सुहास बुद्धे, सीएफएसडीतील डॉ. बुद्धे यांचे सहकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *