नाना पटोले यांचा खोचक सल्ला, फडणवीसांनी वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाला न्याय द्यावा अजित पवारांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत का? पीकविमा घोटाळ्यावर खोटे बोलण्याची गरज काय?

भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु असून दररोज एका मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. हिवाळी अधिवेशनात बीड व परभणीतील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिले त्यातूनच चित्र स्पष्ट झाले. एखादा निष्णात वकील जसा आरोपीला वाचवण्याचे काम करतो तेच काम मुख्यमंत्री यांनी केले. फडणविसांनी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून भाषण केले नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नाहीत म्हणूनच राज्य पेटले आहे, असा घणाघाती आरोप करत फडणवीसांनी अशी वकिली सोडून मुख्यमंत्रीपदाला न्याय देण्याचे काम करावे, असा खोचक सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सरकारमध्ये परिस्थिती भयावह आहे, सरकारला लाडक्या बहिणीची चिंता नाही. २४ लाख विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत त्यातील लाखो बहिणींना सरकार नोकरी देऊ शकत नाही. लाडक्या बहिणींचे पती शेतकरीही आहेत आणि हा शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे. सोयाबिनला ६ हजार रुपयांचा भाव देणार होते पण ३ हजाराचाही भाव मिळत नाही, धान, कांदा, कापसाची स्थितीही अशीच आहे. भावांतर योजना लागू करून फरक देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले. सरकार फक्त जनतेला लुटण्यासाठी सत्तेत आले आहे. भाजपा युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री कलंकीत आहेत. दररोज महाराष्ट्राची प्रतिमा खराब केली जात आहे. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज उघड होत आहेत तीच परिस्थिती पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच भ्रष्टाचार झाल्याचे उघड सांगत आहेत. मागील अडीच वर्षापासून हेच सुरु आहे. शेतकऱ्यांच्या योजनेत ४ टक्के भ्रष्टाचार होतो हे मंत्र्यांनीच सांगितले.

बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळा झाला नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचा आमदारच पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगतो, कृषी मंत्र्यांनीही भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार जर घोटाळा झालाच नाही असे म्हणत असतील तर ते धादांत खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलू नये, कशासाठी ते खोटे बोलत आहेत असा सवाल करत अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू व शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या कपाळावरचे कुंकू विसरू नये, अशी खोचक टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *