मुंबईः प्रतिनिधी
एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला, त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
हे व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे कवी, साहित्यिक, विचारवंत यांनी आपले विचार मांडले. सत्ताधारी पक्षाच्या विचारधारे विरोधात विचार मांडले म्हणून त्यांच्यावर करावाई करणे चुकीचे आहे. हा पुरोगामी, आंबेडकरवादी विचार दाबण्याचा प्रयत्न आहे. कोणी काही वेगळे वागले असेल, कोणाविरोधात काही पुरावे असतील तर आम्ही त्यांचे समर्थन करत नाही. परंतु एकूणच या प्रकरणाचा तपास ज्यापद्धतीने एनआयएकडे देण्यात आला त्याचा वेळ, काळ पाहिला तर सर्वच संशायस्पद वाटते असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
या आधी पुरोगामी विचारांच्या दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्या करून त्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्रातील भाजप सरकार पुरोगामी, आंबेडकरवादी विचार मांडणा-या ‘एल्गार’वर कारवाई करुन या विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. एकूण सर्व परिस्थिती पाहता संशयाला जागा असून देशभरातून यावर चिंता व्यक्त केली जात असल्याचे ते म्हणाले.
Marathi e-Batmya