विधान परिषद निवडणूकः अखेर दोन तासानंतर मतमोजणीला सुरुवात नेमका कोणाचा उमेदवार बाजी मारणार

विधान परिषदेच्या रिक्त १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अतरले असून या निवडणूकीत भाजपाकडून ५ उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी २ असे मिळून ६ उमेदवार उभे केले आहेत. मात्र भाजपाच्या दोन उमेदवारांनी प्रक्रियेनुसार मतदान केले नसल्याचा आक्षेप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी घेतला. तसेच यासंदर्भातील तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. त्यामुळे मतमोजणीला परवानगी मिळाली नव्हती. अखेर दोन तासानंतर मतमोजणीला परवानगी मिळाल्याने मतमोजणीला सुरुवात झाली.

भाजपाचे आजारी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे आजारी असतानाही या दोघांनी पुण्याहून मुंबईतील विधान भवनात येवून विधान परिषदेसाठी मतदान केले. मात्र हे दोघेही सशक्त नसल्याने त्यांनी मतपत्रिकेवर सही केली. परंतु ती मतपत्रिका दुसऱ्याच्या मार्फत मतपेटीत टाकली. नियमानुसार स्वतः मतदाराने आपली मतपत्रिका स्वतःच मतपेटीत टाकणे आवश्यक आहे. मात्र या दोघांनी आपली मतपत्रिका दुसऱ्याच्या माध्यमातून मतपेटीत टाकल्याने काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या मतदानावर आक्षेप घेतला.

अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभेतील निवडणूक निर्णय अधिकारी तात्काळ निर्णय देत काँग्रेसने घेतलेला आक्षेप फेटाळून लावला. मात्र काँग्रेसचे त्या निर्णयाने समाधान न झाल्याने त्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यामुळे मतमोजणी थांबविण्यात आली. अखेर दोन तासांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानेही काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावत थांबलेली मतमोजणी सुरु करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मतमोजणीला सुरुवात झाली.

आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची वेळ संपण्यापूर्वी १० मिनिटं आधीच सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. मतदानानंतर आता निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहे. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत निवडणूकीचा निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मविआच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तर आमचे पाचही उमेदवार निवडून येतील असा दावा भाजपाकडून केला जात आहे. कोणाचा उमेदवार निवडून येईल, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

दरम्यान जर काँग्रेसने आक्षेप घेतला नसता तर साधारणतः ५ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात होवून रात्री ९ वाजे पर्यंत अंतिम निकाल हाती आले असते. मात्र आता अंतिम निकाल येण्यासाठी उशीराने येणार हे निश्चित.

About Editor

Check Also

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे स्टार प्रचारक जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *