महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बिहारचे राज्यपाल महामहीम मोहम्मद आरिफ खान यांची पटना येथील राजभवन येथे भेट घेतली.
या भेटीवेळी रामदास आठवले म्हणाले की, बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे जागतिक स्तरावर बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात आले पाहिजे. त्यासाठी महाबोधी टेम्पल अॅक्ट १९४९ रद्द करावा. संविधान लागू होण्यापूर्वीचा हा कायदा आहे. संविधानातील आर्टिकल २५ आणि २६ ने दिलेल्या धार्मिक ट्रस्ट संस्थाच्या अधिकारांचे हनन या टेम्पल अॅक्ट मुळे होत असल्यामुळे हा टेम्पल अॅक्ट रद्द झाला पाहिजे अशी मागणी बौद्ध जनतेची आहे. त्यामुळे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावे असे अशी मागणी राज्यपाल मो.आरिफ खान यांच्याकडे केली.
त्यावर राज्यपाल मो.आरिफ खान यांनी सांगितले की, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथे आपण लवकरच भेट देऊ. बुद्धगया येथे आंदोलन करणाऱ्या भिक्खुसंघाची आपण भेट घेऊ. महाबोधी महाविहार हे बौद्धांचे श्रद्धास्थान आहे. ते बौद्धांनाच मिळाले पाहिजे यासाठी आपण तातडीने प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे बिहार अध्यक्ष देवकुमार वर्मा, जितेंद्र कुमार, चंदन शर्मा, विजय प्रसाद गुप्ता, शिव नारायण मिश्रा, मुंबईतून आलेले देवचंद अंबाडे, प्रकाश जाधव, सचिन मोहिते, दिलीप सुबोध भारत आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Marathi e-Batmya