तंत्रज्ञानात संपूर्ण जगभरात दबदबा असणाऱ्या चीनला भारताने मोठा झटका बसला आहे, कारण आता भारतामध्ये आयफोनची निर्मिती होणार आहे. टाटा समूह भारतात आयफोन बनवणार आहे. टाटा समूहाने भारतात आयफोन असेंबल करणारा विस्ट्रॉन प्लांट विकत घेतला आहे.अॅपल पुरवठादार विस्ट्रॉनचा कारखाना ताब्यात घेण्याचा करार शुक्रवारी अंतिम झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार विस्ट्रॉनच्या संचालक मंडळाने शुक्रवारी या विक्रीला मंजुरी दिली. आतापासून, आयफोनचे उत्पादन टाटा समूहाद्वारे भारतात केले जाईल आणि असेंबल केले जाईल, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी २७ ऑक्टोबर रोजी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X द्वारे दिली. त्यामुळे आता भारतात आयफोन निर्मितीमुळे किमती काही प्रमाणात कमी होऊ शकतात.
अहवालानुसार, विस्ट्रॉनच्या कारखान्याचे मूल्य अंदाजे $१२५ दशलक्ष इतके आहे. टाटा समूह आणि विस्ट्रॉन यांच्यात गेल्या एक वर्षापासून या करारासाठी चर्चा सुरू आहे. विस्ट्रॉनचा हा प्लांट आयफोन-१४ मॉडेलच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. सध्या या प्लांटमध्ये १० हजारराहून अधिक कामगार काम करतात.तैवानची कंपनी विस्ट्रॉनने २००८ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्यावेळी कंपनी अनेक उपकरणांसाठी दुरुस्ती सुविधा पुरवत होती. यानंतर,२०१७ मध्ये, कंपनीने आपल्या कार्याचा विस्तार केला आणि आयफोनचे उत्पादन सुरू केले.
ऍपलच्या अटींनुसार नफा मिळविण्याच्या आव्हानांमुळे विस्ट्रॉनने भारतातील आयफोन असेंबली कारखाना विकण्याचा निर्णय घेतला. भारतातील एकमेव आयफोन असेंब्ली प्रदाता म्हणून कंपनीला नफा मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. टाटाच्या अधिग्रहणानंतर, विस्ट्रॉन पूर्णपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडेल. गेल्या वर्षी कॅलिफोर्नियाची कंपनी ऍपल ने चीन आणि अमेरिका यांच्यातील वादामुळे जगभरातील सुमारे २५ % उत्पादन भारतात हलवण्याची योजना जाहीर केली होती.
Marathi e-Batmya