कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन, पीक विम्याची थकीत ५०३ कोटी रक्कम १५ दिवसांत ५० लाख, ९८ हजार ९९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५६ लाख भरपाई

पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई देत असून उर्वरित ५०३ कोटी रुपयांची रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली.

तसेच केवळ एक रुपयांत पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे, हा राज्य सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी विरोधकांच्या २९३ च्या प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, पीक विम्याचे ६३ लाख ११ हजार २३५ लाभार्थी आहेत. ५० लाख, ९८ हजार ९९ शेतकऱ्यांना २ कोटी ३५६ लाख भरपाई मिळाली आहे. अद्याप ५०३ कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम प्रलंबित असून ती पुढील १५ दिवसांत जमा होईल.

सरकारने पीक विम्यासाठी केवळ एक रुपयांत नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर कुठल्याही अर्थमंत्र्याला हे सुचले नाही. या योजनेसाठी तीन हजार ३१२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार ३४२ कोटी रुपये बँक खात्यात जमा केले आहेत. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील दोन टक्केही खर्च झाले नाही असे म्हणणे बरोबर नाही. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ६५ कोटी, ८८ लाख रुपये म्हणजे ८० टक्के पैसे खर्च झाले आहेत. १०८ कोटी रुपयांचा दुसरा टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून ३१ मार्चपूर्वी हा निधी खर्च केला जाईल. या निधीतून ५८ कोटी, ४८ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात येणार आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वर्ग तीनच्या बदल्यासंदर्भातील प्रश्न प्रस्तावावरील चर्चेदरम्यान उपस्थित केला होता. कृषीमंत्र्यांनी विभागांतर्गत आदेश काढून बदल्या स्थगित केल्याचे सांगितले होते. त्याला कृषीमंत्र्यांनी उत्तर दिले. बदल्यांना आधीच स्थगिती असल्याने मी स्थगिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाषण वाचून दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर आक्षेप घेत अशी वाचून दाखविण्याची प्रथा नसल्याची आठवण करून दिली.  त्यावर सत्तार यांनी सावध होत भाषणाला सुरुवात केली. मात्र, पाटील सभागृहाबाहेर जाताच पुन्हा भाषण वाचून दाखविण्यास सुरुवात केली.

महानंदच्या कामचुकारांना व्हीआरएस द्या: अजित पवार

पशुसंवर्धन विभागाच्या प्रश्नांवर उत्तर देताना पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महानंदचे एनडीडीबीमध्ये विलीकरण करण्यास अनुमती दिल्याचे सांगितले. यासाठी महानंदच्या काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती द्यावी लागेल असे सांगितले. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महानंद टिकवायचा असेल तर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे तिचे हस्तांतर होणे आवश्यकच आहे. पण कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देताना चांगल्या कर्मचाऱ्यांवर ती वेळ आणू नका, कामचुकार कर्मचाऱ्यांना प्रथम निवृत्त करा, अशी मागणी केली.
विखे पाटील यांनी लम्पीमुळे मृत जनावरांच्या मालकांना ७० कोटी रुपयांची भरपाई दिल्याचे सांगितले.

राज्यातील ४ लाख ,६९ हजार पशुधन बाधित झाले त्यापैकी ४ लाख, २७ हजार पशुधन बरे झाले. तर ३७ हजार ६०० पशुधनाचा मृत्यू झाल्याचेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

७.५ एचपी वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही केवळ ७.५ हॉर्सपॉवरपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू आहे. शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *