गृह विभागाचे माजी प्रधान सचिव रजनीश सेठ राज्याचे नवे पोलिस महासंचालक राज्य सरकारकडून अखेर पूर्णवेळ नियुक्ती

मराठी ई-बातम्या टीम

फडणवीस सरकारच्या काळात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून आणि तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधनक विभागाचे प्रमुख म्हणून कामगिरी बजाविलेले रजनीश सेठ यांची आज राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती केली. त्यामुळे अखेर राज्याला पूर्ण वेळ पोलिस महासंचालक मिळाला असल्याची भावना पोलिसांमध्ये निर्माण झाली आहे.

तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल हे पुन्हा केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर राज्यातील हे पद रिक्तच होते. तसेच काही काळ मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडेही महासंचालक पदाची धुरा सोपविण्यात आली होती.

मात्र ज्येष्ठत्वाचा मुद्दा पुन्हा निर्माण झाल्याने ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचबरोबर राज्याला पुर्णवेळ पोलिस महासंचालक नसल्याबाबतची याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते.

आतापर्यंत संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. संजय पांडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे आणि बराच काळ या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती न करण्यात आल्याने न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते. दरम्यान, आता राज्य सरकारने रजनीश सेठ यांची नियुक्ती पोलीस महासंचालकपदी केली आहे.

रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. याशिवाय रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत.

About Editor

Check Also

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या जयघोषात भाविकांनी घेतले पावन दर्शन

‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *