दोन आठवड्यापासून मुंबईमध्ये होणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचे एकूण बजेट २०२४-२५ वर्षासाठी ६०,००० कोटींचे आहे. जे एखाद्या छोट्या राज्यापेक्षाही जास्त आहे. इथे पावसाळ्याच्या अगोदर होणारे मुख्य काम म्हणजे नालेसफाई, नदी सफाई आहे. यावर किती खर्च झाला आहे? आजच्या मुंबईच्या या अवस्थेला मुंबई महापालिका जबाबदार आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीने पुढे मुंबईतील नाल्यांवर करण्यात आलेल्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला की, मोठ्या नाल्यांवर जो खर्च झाला तो साधारणतः ९० कोटी आहे आणि छोट्या नाल्यांवर देखील ९० कोटी खर्च आहे. असे एकूण १८० कोटी रुपये नाले सफाईच्या नावाखाली खर्च झाले आहेत. हे मागच्या वर्षीचे आकडे आहेत. याव्यतिरिक्त वॉर्ड स्तरावर जे काही छोटे-मोठे रस्ते आहेत किंवा रस्त्याच्या बाजूचे नाले आहेत तो २००४ किलोमीटरचा तो पट्टा आहे. पूर्ण मुंबईचा अतिरिक्त निधी हा खर्च होत आहे. एकूण २०० ते २५० कोटींच्या वर हा आकडा जात असल्याचे सांगितले.
मुंबईचा पाऊस सुरू होण्याच्याआधी आपले मुख्यमंत्री लाल कार्पेटवर चालून नाले सफाईचे काम पाहत होते. दोन तीन पावसांमध्ये मुंबईची काय अवस्था झाली आहे, असे म्हणत या सगळ्याला कोण जबाबदार आहे? याची उत्तरे कोण देणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
जे पक्ष आज चिन्हांसाठी, नावांसाठी भांडत आहेत त्या सगळ्या पक्षांनी या मुंबई महानगरपालिकेवर २०-२० वर्षे राज्य केले. या सगळ्या प्रश्नांसाठी ते जबाबदार नाहीत का ? हे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे. ज्या जयभीम नगरमध्ये अमानुषपणे त्यांच्या झोपड्या तोडून मुंबई महानगरपालिकेने घरे उद्ध्वस्त केली. आज ७०० कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. या पावसामुळे त्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा. त्या ७०० कुटुंबात अशी अनेक कुटुंबे आहेत की, ज्यांच्या घरात आणि दुकानात पाणी गेले आहे. या सगळ्यासाठी जे राजकीय पक्ष जबाबदार आहेत ते कधीतरी या प्रश्नाचे उत्तर देतील का ? असा सवालही उत्कर्षा रूपवते यांनी सवाल उपस्थित केला.
Marathi e-Batmya