मीरा-भाईंदरः प्रतिनिधी
मिरा भाईंदर महानगरपालिकेतील आस्थापनेवरील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क मिळून देण्यसाठी शासनास भाग पाडू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी नगरभवन येथे केले.
यावेळी सरचिटणीस प्रकाश बने, सह सचिव वरेश कमाने, कोषाध्यक्ष मुंबई मार्तंड द्राक्षे, आरोग्य विभाग संघटनेचे सचिव बाबाराम कदम, राज्य राखीव पोलीस बल संघटनेचे सरचिटणीस सुभाष गोरे हे उपस्थित होते.
सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारसी लागू असताना येथील कामगारांना न्याय का मिळत नाही ? भारत देश लोकशाही पध्दतीवर चालणारा देश आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एकच कायदा आहे. मग येथील कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का ? मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील ५३८ सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करणे, तसेच अनुकंपा करण्यासंदर्भात कायद्याने तसेच नियमाने देण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटने मार्फत प्रशासनास भाग पाडेल. वेळ पडल्यास मोठे आंदोलन करत मंत्रालय बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.
सफाई कामगार म्हणून सन १९९३ पासून कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना सन २००० मध्ये लाड – पागे समितीच्या शिफारसी नुसार कायम करण्यात आले. अशा कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची १०-१२ वर्षे वाया जाऊ नये म्हणून ते पूर्ण भरून काढण्यासाठी त्यांना सेवा ज्येष्ठते मध्ये त्याचा लाभ मिळून देऊ. ज्या कर्मचाऱ्यांना सफाई कामगार मधून पदोन्नती देण्यात आली त्या ५३८ कर्मचाऱ्यांपैकी ५० ते ६० कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. तर ५० कर्मचारी मयत झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली. पण कुटुंब सेवेत येण्यासाठी हक्क दर आहेत. पण प्रशासन कर्मचाऱ्यांना उंबरठे झिजवण्यास का लावते ? यावर आम्ही कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.
मिरा भाईंदर कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष गोविंद परब म्हणाले की, ५३८ कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही सर्वजण महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू.
Marathi e-Batmya