मुंबईः प्रतिनिधी
काल एका कार्यक्रमात मुख्यमंत्री राज्याला संबोधून म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची गरज आहे ? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का ? मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का ? असा आमचा सवाल आहे. डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रतोद अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला.
पब, रेस्टाँरंट, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटी नंतर ते खुले होतात. कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का ? एक्साईजची कमाई हवी म्हणुन दारुची दुकानं उघडी केलीत, मॉल मधल्या कामगारांच कारण सांगून मॉल उघडे केलेत मग या मंदिरांच्या बाहेर नारळ,अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ, अगरबत्ती, फुल विकणाऱ्याचं पोट भरु शकत नाही का? यांच्याशी वाटाघाटी होवू शकत नाही कारण आमचा तो गरीव माणूस या सरकारच्या अपेक्षा काय पुर्ण करणार? म्हणून त्यांना बंदी त्यांच्यावर निर्बंध आणि डिस्को, पब, बार वाले वाटाघाटी करतील, आरोग्य केंद्रात कट कमिशन मिळेल या पद्धतीची भुमिका. आरोग्य केंद्र हवीच पण कट कमिशन नको ही आमची भुमिका आहे. खरतर भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याच काम शिवसेना करतेय असा खोचक टोला लगावत मग गोविंदा असेल, गणेशोत्सव असेल नवरात्र असेल, मंदिर असतील. नियमात राहुन सुरु करु ही भुमिका नाही. भक्तांची देवापासुन ताटातूट करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणुन हा कोरोना बंदीचा कार्यक्रम नाही तर हे देउळ बंदीच शिवसेनेच अभियान असल्याचा आरोप त्यांनी केला.
ज्या पद्धतीने हे प्रकार चालु आहेत त्यावर मुख्यमंत्री कधी बोलतील का हा प्रश्न आहे. आरोग्य केंद्राच बोलतात तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, इथून जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यामधे आदिवासी पाड्यातील ७४१ बालकांचा ६ महिन्यात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कुठे आहे आरोग्य व्यवस्था, कुठे आहेत आऱोग्य केंद्र? कुठे आहेत पायाभुत सुविधा देवालय नको तुम्हाला चालेल, ही तुमची भुमिका असेल पण देवालय बंद करुन एका अर्थाने राज्यभर शवालय तुम्ही उघडली आहेत. महानगरपालिकेच्या इस्पितळात डोळा कुरतडून खाल्ला म्हणुन मृत्यू, सायन ते नायर शवाच्या बाजुला जिवंत माणसाची ट्रिटमेंट, कोविड सेंटर मधे टॉयलेट मध्ये मृत्यू आणि आता बालकांचा मृत्यू. थोडी तरी संवेदनशीलता मुख्यमंत्री दाखवा…. असे आवाहनही त्यांनी केले.
हा राष्ट्रवादीचा आरोप की मुख्यमंत्र्यांना इशारा
काल नवाब मलिक यांनी जावईशोध प्रगट केला… खंरतर यामध्ये राष्ट्रवादीने आरोप केलाय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला व इशारा लगावलाय हे कळत नाहीये. आमचं म्हणण हा भाजपा वरचा आरोप नाही. हा शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षमतेवर केलेला टोला आणि इशारा आहे. कारण जेव्हा प्रशासनावर मांड मांडण्याची सत्ताधीशांची हिमंत नसते तेव्हा प्रशासकीय अधिकारी राज्य वाचविण्यासाठी विरोधी पक्षांकडे जातात हे राज्याने पाहिलयं. हीच खरी शिवसेनेच्या बाबतीत राष्ट्रवादीची भीती आणि इशारा आहे. विरोधी पक्ष नेते पद घटनात्मक पद आहे, अधिकाऱ्यांनी भेटल तर काय गुन्हा आहे. खरतर सत्य आहे, राष्ट्रवादीला होवू घातलेल्या राजकीय भुकंपा आधी त्यांनी दाखल केलेली कॅवियेट म्हणजे बचाव विधान आहे.. ते नवाब मलिक यांनी केलं आहे. याच कारण या वसुली सरकारने, विशेषतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयातून बदल्यांमधे जे काही हेराफेरी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार जो काही अधिकाऱ्यांनीच सरकारच्या निदर्शनास आणुन दिला. ती माहिती लपविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. मुंबई उच्च न्यायालयात गेले, सर्वोच्च न्यायालयात गेले. ठाकरे सरकार दिशाहीन तर होतच आता बुद्धीहीन झाल्याची टीका त्यांनी केली.
हे तर आई जाच करते म्हटल्यासारखे
यावेळी काल शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता अॅड शेलार म्हणाले, यंत्रणांचे अधिकारी काम करत असतील तर यांच्या पोटात दुखण्यात काय कारण? यंत्रणांच्या कार्यक्षमता विस्तारल्या आहेत, अधिकारी काम करतायेत, भ्रष्टाचाराची प्रकरण तडीला लागत आहेत, राज्यात देशात नियमांच, कायद्याच राज्य सुरु झाल आहे. अस झाल की राष्ट्रवादीच्या पोटात दुखायला लागेल. स्वतच्या पक्षाच्या, नेत्यांच्या भ्रष्टाचाराची, गैरकारभाराची प्रकरण लपवता येत नसतील तर यंत्रणांवर दोष करा. आईने अभ्यास म्हटल्यावर आई चांगल सांगतेय हे म्हणण्याऐवजी स्वताचे अवगुण लपवायला आई जाच करते असं म्हणण्यासारखं हे आहे. सहकार क्षेत्राच्या मजबुतीच काम सुरु आहे. आले माझ्या मना या पद्धतीने सहकारातील संस्था देशोधडीला लावण्याच काम काँग्रेस राष्ट्रवादीने केलय. या नेत्यांना आणि पिलावळीला वेसण बसली म्हणुन अडचण निर्माण होते आहे. स्वैराचार करण्याची मुभा द्या कायद्याच्या चौकटीत बसायच नाही अशा स्वरुपाच हे विधान असल्याच ते म्हणाले.
शिवसेना हिंदुत्व आणि हिंदु सणांविरोधी
हे सर्व प्रकार म्हणजे शिवसेना हिंदुत्व आणि हिंदु सणांविरोधी असल्याचं आहे. काळजी घ्या पण आपला उत्सव साजरा करा अस का म्हणता येत नाही. केवळ सत्तेच्या मोहापाटी हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला वसा यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागून सोडला असल्याची टीकाही त्यांनी केली.
Marathi e-Batmya