मुंबईः प्रतिनिधी
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्च पर्यंत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डिएड. बीएड, इंजिनियरींग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावरील परिक्षा ३१ मार्चनंतर घेण्यात येणार असून याबाबतचा निर्णय २७-२८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यास रोखणे गरजेचे आहे. त्यादृष्टीकोनातून ३१ मार्च २०२० पर्यंत विद्यापीठ आणि महाविद्यालयस्तरावरच्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर २५ मार्च २०२० पर्यंत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होम अर्थात घरी राहून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. याकालावधीत झालेल्या परिक्षांचे पेपर तपासणी, प्रश्नपत्रिका तयार करायच्या असतील त्या तयार करणे आदी गोष्टी त्यांना करता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
२७-२८ मार्चला परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत त्यावेळची परिस्थिती पाहून ३१ मार्चनंतर परिक्षा घ्यायची का कि आणखी नंतर घ्यायची याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणारे डीएड, बीएड, इंजिनिअरींग महाविद्यालये, विद्यापीठस्तरावरील परिक्षा आदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भातील आदेश-परिपत्रक सर्व कॉलेजला संध्याकाळपर्यंत पाठविण्यात येणार असून उद्यापासून याची अंलबजावणी करण्यात येणार आहे. यानिर्णयामुळे ३ हजार १२० महाविद्यालयांची परिक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे सांगत महाविद्यालयीनस्तरावरील खाजगी शिकविण्याही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya