मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित आघाडी या पक्षांकडून सोशल मिडीयावरील ट्वीटर, फेसबुक आणि व्हॉट्सअँपवरूनच एकमेकांवरोधात टीका टिपण्णी करत असल्याने सोशल मिडीयाच प्रचाराचे अड्डे होताना दिसत आहे. त्यामुळे जनताही या टीका टीपण्णीतून मनोरंजन करताना दिसत आहे.
सद्यपरिस्थितीत तंत्रज्ञानातील क्रांतीचा लाभ सर्वच राजकिय पक्षांकडून उठविला जात आहे. निवडणूकीच्या निमित्ताने तर प्रत्येक राजकिय पक्षाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दवडली जात नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच वर्धा येथे युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. या सभेत मोदी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. परंतु सोशल मिडीयावर पवारांवरील टीकेची चर्चा होण्याऐवजी मोदींच्या सभेला रिकाम्या राहीलेल्या खुर्च्यांचीच चर्चा अधिक झाली. त्यासाठी विरोधकांकडून रिकाम्या खुर्च्याचे फोटो आणि व्हीडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले.
त्यापाठोपाठ मोदींवरील टीकेला तातडीने उत्तर देण्यासाठी भाजपकडून लगेच दुसऱ्या दिवशी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्याची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे या खिल्लीसाठी वापरण्यात आलेली भाषा ही निवडणूकीचा निकाल लागण्यापूर्वीच पराभवाची असल्यासारखी वापरण्यात आली आहे.
याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी यांच्या जून्या भाषणांचे व्हीडीओ क्लीप आणि त्याला विविध टीका-टीपण्णी करणारे आवाज अथवा गाणी जोडून व्हायरल करण्यात येत आहेत. प्रचाराच्या भाषणात एखाद्या कार्यकर्त्याकडून पक्षाविषयी बोललेल्या गंमतीशीर विधानांचे व्हीडीओही बनवून ते व्हायरल करण्यात येत आहे. भाजपच्या फेसबुक आणि ट्वीटरवरील पेजवरील विरोधकांवरील टीकेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मिडीयावरील पेजवर भाजप, मोदी, फडणवीस, दानवे यांच्यावरील टीकेचे व्हीडीओ, फोटो मोठ्या प्रमाणावर आहेत.
या व्हीडीओ, फोटो आणि गाण्यांमधून मतदार आपले मनोरंजन करून घेत आहे.


Marathi e-Batmya