मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात शेवटच्या टप्प्यात मतदान नुकतेच पार पडले. या चारही टप्प्यात राज्यातील जनतेमध्ये सत्ताधारी भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत जनतेमध्ये समिश्र चर्चा झडत होत्या. त्यामुळे २३ मे रोजी लागणारे निकाल काय असतील याबाबत आतापासूनच उत्सुकता असली तरी राज्य सरकारमधील भाजप मंत्री आतापासूनच महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या येणार असल्याची पैज लावत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील ११ जागांसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर आणि सुटीचे चार दिवस संपल्यानंतर गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने सर्वच मंत्री मंत्रालयात आले. त्यामुळे अनेक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, मंत्र्यांच्या परिचयाचे व्यक्ती अनेक मंत्र्यांकडे चर्चेसाठी जात होते. त्यापैकी एका मंत्र्याने कोल्हापूरपासून मावळ, शिरूरपर्यंतच्या सर्व जागा भाजप-शिवसेना युतीलाच मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
तर राज्य मंत्रिमंडळातील संकटमोचक आणि हनुमान म्हणून ओळखले जाणारे मंत्र्याने तर पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक जागा या आमच्याच येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत या जागा जर नाही आल्या तर आपण राजीनामा देवू अशी पैजच उपस्थितांशी लावली.
त्यामुळे मोकळ्या चर्चेसाठी गेलेले त्यांचे सर्वच हितचिंतक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना गप्प राहण्याशिवाय पर्याय राहीला नाही.
Marathi e-Batmya