“नवाब मलिक सरकार हाय हाय ?” आणि भाजपाने केली चुकीची दुरूस्ती चुकलेल्या घोषणेनंतर केली सारवा सारव

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या काही दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉंडरींग प्रकरणी अटक केली. मात्र त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून अधिवेशनाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा भाजपाने दिला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत भाजपाच्या सदस्यांनी मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंंधळातच सभागृहाचे कामकाज चालल्यानंतर शोकप्रस्ताव झाला.
त्यानंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व आमदार प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी विधानभवनाच्या परिसरात असलेल्या प्रसार माध्यमांशी बोलण्यासाठी आले. मात्र भाजपा आमदारांनी दिलेली एक घोषणा गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांचा गोंधळ उडवून गेली.
शोक प्रस्तावानंतर अधिवेशनाचे कामकाज स्थगित करण्यात आल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष लावून धरणार असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलण्यापूर्वीच काही भाजपा आमदार त्यांच्या पाठिमागे उभे राहून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते. तेव्हाच नेमका हा प्रकार घडला.
देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलण्यासाठी उभे राहिले असताना त्यांच्या उजवीकडे चंद्रकांत पाटील आणि डावीकडे गिरीश महाजन उभे होते. तसेच मागच्या बाजूला भाजपाचे काही आमदार देखील उभे होते. यावेळी भाजपा आमदार जोरजोरात घोषणाबाजी देत होते. “ठाकरे सरकार हाय हाय, दाऊद सरकार हाय हाय”, अशा घोषणा देण्यात येत होत्या. परंतु या घोषणांच्या पाठोपाठ अचानक भाजपा आमदार “नवाब मलिक सरकार हाय हाय”, अशा घोषणा देऊ लागले. पहिल्या घोषणेला त्यांच्या पाठोपाठ ‘हाय हाय’ म्हणणाऱ्या गिरीश महाजनांना पुढच्याच क्षणी चूक लक्षात आली.
फडणवीसांच्या बाजूला उभ्या असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी देखील ही घोषणा होऊ शकत नाही, असे बोलून टाकले. हे नवाब मलिक सरकार नसून ठाकरे सरकार आहे, त्यामुळे अशी घोषणा होऊ शकत नाही, हे लक्षात येताच गिरीश महाजनांनी मागे वळून क्षणार्धात हीच घोषणा ‘सुधारीत’ करून टाकली. भाजपा आमदारांची घोषणा बदलून गिरीश महाजनांनी स्वत:च “नाही रे, नाही रे” म्हणत पुढची घोषणा दिली “जवाब दो, जवाब दो, उद्धव ठाकरे जवाब दो” अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *