महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली.
बुधवारी सकाळी नागपूर विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांशी बोलत होते. तसेच काल रात्री नवी दिल्लीत उशीरापर्यंत भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाच्या नेतृत्व बदलावर चर्चा झाली. मात्र दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रात नेतृत्व बदल होणार नाही असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता भूमिका स्पष्ट केली.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल, त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत.
दिल्लीमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेविषयी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला. जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करू, अशी ग्वाहीही दिली.
महाराष्ट्रात धन्यवाद यात्रा
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील ५ वर्षात होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद आभार दौरा करणार आहेत, ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले यांनी मोदींनी माझ्यावर प्रत्येक सभेत टीका केली हे माझे भाग्य आहे, शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले असून शेतकऱ्यांच्या मदतीने आम्ही सत्ताबदल करू असे विधान केले या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी एखाद्या शब्दाने टीका केली, तुम्ही मागील दीड वर्षापासून मोदीजींना काय काय बोलत आहात… महाराष्ट्राच्या जनतेनेही नोंद घेतली असा टोलाही यावेळी लगावला.
विधानसभेत अजित पवार महायुतीसोबत असणार का?
या सवालावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या सर्व नेत्यांना एकत्र काम करत महायुतीच्या माध्यमातून पुढे जायचे आहे आणि महायुतीला पुढे नेण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे की अजित पवार यांना टार्गेट केले तर आम्ही आमचा वेगळा विचार करू- यावर ते म्हणाले की, कोणी आणि का म्हटले… आमच्याकडून असे कोणी बोललेले नाही, आमच्याकडून असा कोणी प्रयत्न देखील करत नाही. ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना लखलाभ, आमच्याकडून अशी कोणतीही भूमिका नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याबाबतची काळजी सरकारने घेतली पाहिजे, अशी भूमिका आमची पहिल्यापासून आहे.
नाना पटोलेंवर यांच्या त्या व्हिडीओवरून टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाना पटोले इतक्या खालच्यास्तराला गेले आहे की शेतकऱ्याला पाय धुवायला लावत आहे. महाराष्ट्राला अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला आहे. इंग्रजांच्या काळात ज्या पद्धतीने देश गुलामगिरीत होता, काँग्रेसने पुन्हा इंग्रजांचा काळ आणला आहे. इंग्रजांच्या काळातील जी मानसिकता होती, ती नाना पटोले यांनी स्वीकारली आहे. नाना पटोले यांचा मी निषेध करतो. नाना पटोले यांनी त्यांच्या पदाचा आणि व्यक्ती म्हणून स्वतःचा देखील अपमान केला आहे. भविष्यात नाना पटोले यांनी स्वतःचा झालेला बुद्धिभेद दुरुस्त केला पाहिजे असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.