वरळीतील सभेवरून अजित पवार म्हणाले, सर्वसामान्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांची जंगी सभा… एकाच वाक्यात उडविली खिल्ली

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरळी येथील जांबोरी मैदानावर कोळी बांधवांकडून जाहिर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भाषण करत असताना काही लोक उठून जात असल्याचा आणि सभेच्या ठिकाणच्या अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचा एक व्हिडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला. या सभेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत म्हणाले, वरळीमध्ये जंगी सभा झाली, भव्य सभा झाली. मी पण पाहिली, माध्यमांनी पण दाखवली. सर्वसामान्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांची जंगी सभा झाली. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत असे सांगत खिल्ली उडविली.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा निषेध करताना अजित पवार म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत होते. मविआचा विद्यमान आमदार असल्यामुळे म्हात्रेंना शिवसेनेकडून तिकीट मिळू शकले नाही. नाहीतर तोही निकाल आमच्याबाजूने लागला असता. आदित्य ठाकरे त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, काहींना बघवत नाही. सत्ता मिळाल्यानंतर हुरळून न जाता लोकांसाठी काम करायचे असते, असा रडीचा डाव खेळायचा नसतो. महाराष्ट्रातील लोकांना हा रडीचा डाव आवडत नाही. जे कुणी असे करत आहेत, त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आमच्या पक्षातील लोकांनी देखील असे केले तरी त्याचे समर्थन मी करणार नाही.

विरोधक असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, कोणत्याही पक्षाचे नेते राज्यात फिरत असताना आदर दिला पाहीजे. विचारधारा वेगळी असू शकते, विचारांचा सामना विचारांनी करावा. पण हे दगडं मारणं, शाई फेकणं किंवा हिंसा करणं अयोग्य आहे. अहिंसेच्या मार्गाने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणीच करु नये, असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी हा मुद्दा अनेकवेळा मांडला आहे. जाहीर सभेत याबाबत बोललो आहे. मंत्रिमंडळात महिलांना स्थान द्या, असंही मी सांगितलं आहे. मात्र, हे सरकार महिलांचा अपमान करत आहे. यामुळे महिला भगिनींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी आणि पुढच्या निवडणुकीला विचार करूनच मतदानाचं बटन दाबावं, अशी गंमतीशीर प्रतिक्रिया दिली.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे

पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *