विधानसभेच्या कामकाजात दाखवण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनांच्या संख्येवरून शुक्रवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या दोघांमधील वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केला. या गोंधळामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊ लागले. तेव्हा तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी हस्तक्षेप करीत सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या प्रतोदांनी नवीन सदस्यांना शिस्त शिकवावी, अशा शब्दात सागर यांनी शिंदे गटाची कानउघडणी केली आणि वादावर पडदा टाकला.
आजच्या कामकाजात ३५ लक्षवेधी सूचनांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्यांनी कमीत कमी वेळेत आपले म्हणणे मांडा, अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यानंतर तालिका अध्यक्ष म्हणून योगेश सागर आसनस्थ झाले. लक्षवेधी सूचना पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील उभे राहिले आणि त्यांनी एका दिवसाच्या कामकाजात लक्षवेधी सूचना घेण्यावरून नियमांवर बोट ठेवले.
जयंत पाटील म्हणाले की, एका दिवशी तीन लक्षवेधी सूचना मांडता येतात आणि प्रत्येक लक्षवेधी सूचनेवर सदस्यांना बोलण्यासाठी १० मिनिटांचा वेळ दिला जातो. पण एका दिवशी ३५ लक्षवेधी सूचना लक्षवेधी सूचना मांडण्याची संधी देऊन तुम्ही कोणाला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहात? असा सवाल करत आपण चार प्रस्ताव एकत्रित आणले आहेत. मग सदस्य बोलणार कधी, अशी विचारणाही केली.
या चर्चेत सहभागी होताना भास्कर जाधव म्हणाले की, लक्षवेधी सूचना या एका मतदारसंघाच्या असतात. पण मागण्यांवरील चर्चा या सर्व राज्याच्या असतात. त्यामुळे तुम्ही एका दिवशी ३५ लक्षवेधी सूचना कशा घेतल्या? असा सवालही उपस्थित केला. त्यावर निलेश राणे यांनी सत्ताधारी बाकावरून मागील बाजूने काही शेरेबाजी केली. त्यामुळे भास्कर जाधव संतप्त झाले. यावेळी भास्कर जाधव आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. योगेश सागर यांनी यात हस्तक्षेप करत या वादावर पडदा टाकला.
Marathi e-Batmya