राज्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण, माता व बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच विविध संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी शासनाच्या माध्यमातून एक कृती दल (टास्कफोर्स) तयार करण्यात आला आहे. या कृती दलाचे अध्यक्ष डॉ दीपक सावंत यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ दिपक सावंत यांचे अभिनंदन केले.
एकनाथ शिंदे अभिनंदन करताना पुढे म्हणाले की, माता व बालके यांचा सर्वांगिण विकास हे शासनाचे प्रथम उद्दिष्ट असून ते साध्य करण्यासाठी कृती दल कार्यरत असणार आहे. या विषयासंदर्भात वेळोवेळी आढावा घेवून उपाययोजना सुचवून नाविण्यपूर्ण संकल्पना सावंत यांच्या माध्यमातून पुढे येतील. डॉ दिपक सावंत यांचा आरोग्य खात्यातील अभ्यासपूर्ण कामाचा आढावा घेता त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी ते उत्कृष्टरित्या पार पाडतील याबाबत विश्वास असल्याचे सांगितले.
शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील माता व बालके यांची आरोग्यविषयक काळजी घेत शासनामार्फत विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. या योजना, उपक्रमांविषयी आदिवासी भागात जनजागृजी करण्यासाठी शासन कार्यरत आहे. कृती दलच्या माध्यमातून प्रभावीपणे यासंदर्भात काम केले जाणार आहे. अध्यक्ष डॉ दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कृती दल नियोजनबद्ध व प्रभावी कार्य करेल, याची खात्री असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
Marathi e-Batmya