“या रे दसरा मेळाव्याला” शिंदे गटाने मोजले १० कोटी रूपये?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर निर्बंध उठवून सार्वजानिक उत्सव धुमधडाक्यात साजरे झाले. त्यामधून जनमत आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा धडाका सरकारने लावलेला दिसतो. याचाच एक भाग म्हणून आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून गर्दी जमा करण्यासाठी मोठी रस्सीखेच लागलेली दिसून येत आहे. शिंदे गटाने बीकेसीतील मेळाव्यासाठी जास्तीत जास्त समर्थकांना आणण्यासाठी तब्बल १७०० एसटी बसेस आरक्षित केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी शिंदे गटाकडून तब्बल १० कोटी रुपये रोख भरल्याची माहिती आहे. केवळ शिवसेनेला टक्कर देण्यासाठी शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर आयोजित केला आहे. या मेळाव्या निमित्ताने दोन्ही बाजूने जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे.

यावर्षीच्या दसरा मेळाव्यामुळे तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आता सोन्याचे दिवस आले आहेत. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे गटाकडून तब्बल १७०० हून अधिक एसटीच्या लालपरी बस गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी शिंदे गटाकडून रोख १० कोटी भरले आहे. इतकी मोठी रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. दसऱ्याच्या उत्सवा निमित्त पहिल्यांदाच इतके मोठे बसगाड्याचं आरक्षण एसटी महामंडळात झाले आहे.

दरम्यान शिंदे गटाच्या या मेळाव्याकरीता वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यातून एकूण १२ बसगाड्या मुंबईकडे निघाल्या आहेत. मुंबईत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे मेळाव्यांना दोन्हीकडून आपापले शक्ती प्रदर्शन करीत आहेत.

या मेळाव्यासाठी नाशिकमधून ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटाने नाशिकमधून बीकेसीच्या मैदानावरती ५० हजाराहून अधिक शिवसैनिक जाणार असल्याचा दावा केला आहे. तर ठाकरे गटाने देखील २० ते २५ हजार शिवसैनिक शिवतीर्थावर उपस्थिती लावतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

नाशिक मधून तब्बल ३३७ बसेस आणि ४२४ चारचाकी वाहनांच नियोजन केलं आहे. आम्हाला भाड्याने लोक आणण्याची गरज नसून जे येतील ते कट्टर शिवसैनिक असतील असा दावा केला आहे. ठाकरे गटाने केवळ जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी १०० बसेसच नियोजन केलं आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा आपल्या मतदार संघातून सुमारे ३५० एसटी बस मुंबईला रवाना होतील असा दावा केला आहे.

दरम्यान, मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयात यासंदर्भात चौकशी करण्यात आली असता अशी कोणतीही रक्कम एसटी महामंडळाच्या कोणत्याही डेपो मध्ये जमा झाली नसल्याची माहिती येथील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

About Editor

Check Also

योगेश कदम यांची माहिती, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी ‘विशेष कृतीदल’ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी घुसखोरांमुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली असून यामुळे ‘लॅण्ड जिहाद’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *