एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देत, संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिली भेट

एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे, असेही यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत त्यांनी मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, या निवडणुका ग्रासरूट लेव्हलच्या असतात. कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते, परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्त्व घेत असतो. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

महायुतीमधील अंतर्गत मतभेदांबाबत एकनाथ शिंदे यांनी सांगितले, महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत. मिठाचा खडा पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे सांगत पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर भाष्य करताना, धंगेकरांना मी स्पष्ट संदेश दिला आहे, आवश्यक असल्यास मी स्वतः त्यांच्याशी बोलेन, असेही यावेळी सांगितले.

बिहार निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांनी आत्मविश्वास व्यक्त करताना सांगितले की, एनडीए गटबंधन निश्चितच बहुमताने विजय मिळवेल. मुंबई, ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागल्याचे नमूद केले. तसेच मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचा दावा केला.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती वाढली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि मोदी नेहमी महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख करतात, कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिल्याचे यावेळी सांगितले.

साताऱ्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. एका आरोपीला अटक झाली असून इतरांना लवकरच अटक होईल. दोषींना कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एमपीआयडी प्रकरणी जलद कारवाईसाठी कायद्यात बदल करणार आर्थिक फसवणूक प्रकरणांमधील आरोपीवर कडक कारवाई

आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमधील आरोपींवर कठोर कारवाई करताना जप्त मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *