मुंबई : प्रतिनिधी
परप्रांतातीय लोक महाराष्ट्रात येवून राज्यात इथे व्यवसायात शिरले आणि आपण नोकरी करत बसलो. पण हे समजून घ्यायला हवे की उद्योग, व्यवसायासाठी राज्यातली भूमी पोषक होती म्हणून ते इथे येऊ शकले आणि यशस्वी होऊ शकले. आपले दुर्दैव असे आहे की महाराष्ट्रातील शहरांचे महत्त्वच मराठी माणसांनाच कळले नसल्याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र बिझनेस क्लबमध्ये बुधवारी मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मराठी उद्योजकांनी आक्रमक व्हायला हवे. मुळात व्यवसाय करताना महाराष्ट्र ही भूमी समजवून घ्यायला हवी. आपल्या शहरांमध्ये मराठी लोकसंख्या कमी होत आहे आणि बाहेरील लोकांची संख्या वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात सात-आठ महानगरपालिका आहेत. ठाण्यात लोकसंख्या वाढत आहे. ही शहरे जर मराठी माणसाच्या हातातून गेली तर तुम्हाला कोणी विचारणारसुद्धा नाही, असे ते म्हणाले.
महानगरपालिकेत कंत्राटदार राजस्थानमधील एका गावातील आहेत. यावरून राजस्थानच्या लोकांच्या अंगात व्यवसाय किती भिनले आहे हे तुम्हाला जाणवेल. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जर आपल्या राज्याचा विकास व्हावा असे वाटत असेल. हेच त्यांच्या मनात सातत्याने असते. त्यांना बुलेट ट्रेन पण गुजरातमध्येच हवी असते. मग आपण आपल्या राज्याचा, मराठी माणसाचा विचार का करू नये, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्राला मिळालेल्या एकूण आठ भारतरत्नांपैकी सात कोकणात आहेत. आज अशा कोकणात चायनीजच्या गाड्या का लागतात? तिथे आपले पदार्थ का मिळत नाहीत? मी राजकीय पक्ष काढला. चढउतार मलापण बघायला लागले. तुम्ही व्यवसाय करत आहात तेव्हा तुम्हालापण चढउतार बघावे लागणार. पण याने डगमगून जायचे नाही. तुम्ही मराठी व्यावसायिकांची डिरेक्टरी तयार करा. मी तुम्हा व्यावसायिकांना पुढे जायला मदत करीन, असे आश्वासनही त्यांनी दिले.
Marathi e-Batmya