भाजपाच्या विरोधाला न जुमानता निवडणूक लढवणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी केला. आपण मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले असून ते २९ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही जाहिर केले.
नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा केली होती. मात्र भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या नावाला विरोध दर्शवला. मलिक यांची मुलगी सना मलिक-शेख हिच्या नावाला फडणवीस यांनी विरोध केला नाही. त्यामुळे दिल्लीहून परतल्यानंतर अजित पवार यांनी सना मलिक-शेख हीची उमेदवारी जाहीर केली.
नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी करत त्यांना विरोध केला. मात्र, ही बाब देवेंद्र फडणवीस यांनीच उपस्थित केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणात नवाब मलिक अद्याप दोषी ठरले गेलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार यांनी नवाब मलिक यांचा आपल्या गटात समावेश केला आहे. अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवार करण्यामागे कारण असून नवाब मलिक त्यांच्या कामाच्या जोरावर निवडणूक जिंकतात. तसे, नवाब मलिक सध्या प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर आहेत. अजित पवार दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याचे वृत्त आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाच्या विरोधामुळे अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तर नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत पाठिंबा राहणार असल्याची माहिती सुत्रानी दिली.
Marathi e-Batmya