आणि शरद पवार यांनी थांबविले मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी उध्दव ठाकरे निघाले होते राजभवनावर

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक विषयावर आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील संभ्रमावस्थेवर जैसे थे असे आदेश देत बंडखोर आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी १२ जुलै पर्यंतची मुदत दिली. तर गटनेते पदी अजय चौधरी आणि प्रतोद पदावरील सुनिल प्रभू यांच्या नियुक्तीवरूनही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेसह शिवसेनेला नोटीस दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्यासाठी राजभवनावर निघाले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना रोखल्याची माहिती पुढे येत आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासहित पक्षाच्या आमदारांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील आमदारांना १२ जुलैपर्यंत दिलासा दिला. त्यामुळे त्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही. यापार्श्वभूमीवर इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते.

उद्धव ठाकरे आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ इच्छित होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखल्याची बाब या वृत्तात देण्यात आली.
शरद पवारांनी याआधी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून रोखलं आहे. एकनाथ शिंदे आणि २१ आमदार सूरतमध्ये गेले होते त्याच दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राजीनामा देत याची घोषणा करणार होते. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना रोखल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राजीनामा देण्याचा विचार करत होते. उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण पुन्हा एकदा शरद पवारांनी मध्यस्थी केली.

उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा करण्याआधी शरद पवारांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. यामुळेच उद्धव ठाकरेंचं फेसबुक लाईव्ह अर्धा तास उशिरा सुरु झालं असं कळत आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हमध्ये मी मुख्यमंत्री नको असल्यास समोर येऊ सांगावं, पद सोडेन असं आव्हान बंडखोरांना दिले. तसेच त्याच रात्री उद्धव ठाकरेंनी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडला आणि मातोश्रीवर राहण्यास गेले. आपण मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडला आहे, पण जिद्द नाही असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं असून, “हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय” असल्याचे म्हटले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *