सध्या माझ्याबद्दल बरंच सोशल मीडियावर लिहिलं जात आहे की मौलवी, काझीला शिव्या दिल्या वैगेरे. काँग्रेसचे जे भडवे आहेत लिहिणारे ते लिहितील त्याबद्दल मला फरक पडत नाही. मुस्लिम समाज वंचितकडे चालला आहे. मुस्लिम समाज वंचितकडे गेला तर आपलं काय होणार? म्हणून त्यांना आता जड वाटायला लागले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दर्यापूर येथील सभेत म्हटले आहे. ते अंकुश वाकपांजर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, नुपूर शर्मा या महिलेच्या विरोधात लोक जेव्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, त्यावेळी न्यायालयाने सांगितले आमचे हात बांधले आहेत, आम्ही काहीच करू शकत नाही. कारण कायदाच नाही. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने निवडून आणलेले आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात किंवा इथल्या कोणत्याही देव देवतांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला ७ वर्षांची शिक्षा झाली पाहिजे हा कायदा व्हावा म्हणून आम्ही मोहम्मद पैगंबर बिल विधान परिषदेत मांडले असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात विधानसभेच्या ३२ जागा अशा आहेत. जिथं एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आणि उध्दव ठाकरे यांचा उमेदवार आणि तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा आहे. एकनाथ शिंदे यांची मुस्लिमांप्रती भूमिका भाजपासोबत असल्याने सारखीच आहे. उध्दव ठाकरेंची भूमिका काय ? असा सवालही या वेळी उपस्थित केला.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, ठाकरे आजही जाहीरपणे सांगतात की, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद शहीद केली त्याबद्दल मला अभिमान आहे. मी मुस्लिमांना विचारतो लोकसभेत संविधानाच्या मुद्द्यावर तुम्ही त्यांना मतदान दिले, पण आता काय आहे ? तुम्ही ज्यांचे स्मरण करून नमाज अदा करता त्या मोहम्मद पैगंबर यांचं बिल येत असेल आणि ते बिल वंचित बहुजन आघाडी आणत असेल तर तुम्ही वंचितला का मतदान करत नाहीत? असा सवालही यावेळी केला.
शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुस्लिम समाजाने एक लक्षात घ्यावं की, दंगल करायची असेल तेव्हा एक तर मशीदचा वापर केला जातो किंवा मोहम्मद पैगंबर यांचा वापर केला जातो. त्यांच्या विरोधात लिहिलं जातं. आपल्याला माहीत आहे की, नुपूर शर्मा नावाच्या महिलेने काय वक्तव्य केले होते. मी मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो की, हे घडत राहणार आहे. तुम्ही वाईटच आहात हा स्टॅम्प तुमच्यावर मारला जाणार आणि यातून बाहेर पडायचं असेल, तर वंचित बहुजन आघाडीने आखलेला मार्ग तुम्ही स्वीकारला पाहिजे, असे आवाहन या वेळी केले.
Marathi e-Batmya