रामदास आठवले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यातही ६९ टक्के आरक्षण करा… मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात आरपीआय शांततापूर्ण आंदोलन करणार

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तामिळनाडूत जसे ६९ टक्के आरक्षण आहे; त्या धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण वाढविले पाहिजे. तामिळनाडूत ओबीसी मध्ये दोन प्रकारचे आरक्षण असून एका ओबीसी गटाला ३० टक्के आणि दुसऱ्या ओबीसी गटाला २० टक्के आरक्षण तसेच अनुसूचित जातीला १८ टक्के आणि आदिवासींना १ टक्का आरक्षण असे मिळून ६९ टक्के आरक्षण तामिळनाडूत आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले पाहिजे असे सांगत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनात जीव ओतला असून त्यांचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे मराठा आरक्षण जरूर मिळेल त्यासाठीच्या प्रक्रियेला त्यांनी सरकार ला वेळ द्यावा. मराठा आंदोलकांनी सबुरी संयम बाळगुन शांततेने आंदोलन करावे असे आवाहन आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार पारिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे; सुरेश बारशिंग; दयाल बहादूरे; विवेक पवार; ऍड.आशाताई लांडगे; घनश्याम चिरणकर; संजय डोळसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, ओबीसी समूहात कुणाचा समावेश करावा याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालया कडे पाठवल्यास आमचे मंत्रालय तो प्रस्ताव तज्ञ समितीकडे पाठवतो. त्या समितीच्या निर्णया नंतर आमचे मंत्रालय हा प्रस्ताव मंत्रिमंडळ कॅबिनेट समिती कडे पाठवते. त्यानंतर लोकसभा राज्य सभेत चर्चा होऊन बहुमताने तो प्रस्ताव मंजूर होऊन संबंधित जातीचा ओबीसी मध्ये समावेश केला जातो असे सांगितले.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रिपब्लिकन पक्ष शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी करत ते पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची पूर्वीपासुनची मागणी आहे. मराठा समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असणा-या ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे अशा मराठा समाजातील गरीबांना आरक्षण दिले पाहिजे अशी माझी सुरुवातीपासुन मागणी आहे.

तसेच रामदास आठवले म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा सुरुवातीपासुन पाठिंबा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला आमचा पाठिंबा आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण लवकर सोडणे आवश्यक आहे. अन्यथा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका संभवु शकतो. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर तातडीने निर्णय घेवून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा उपलब्ध

अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक स्तरावर दिसू लागला आहे. कच्चे तेल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *