Breaking News

रावसाहेब दानवे यांचे आवाहन, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ‘मविआ’ कार्यकर्त्यांकडे नको योजनेचे फॉर्म सरकारी यंत्रणेकडेच द्या

लाडकी बहीण योजनेचा वापर करून महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याने महिलांनी या योजनेचे फॉर्म विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे न देता थेट सरकारी यंत्रणेकडे द्यावेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या १८ आणि १९ जुलै रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक ही महायुती म्हणून एकत्रितरित्या लढण्याबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागांबाबत चर्चा झाली. कोणी किती जागा लढायच्या याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांचे वरिष्ठ योग्यवेळी घेतील, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, महायुतीत एकसंधपणा असताना महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे वारंवार दिसून येत असल्याची टीका करत पुढे बोलताना म्हणाले की, मविआतील तिन्ही प्रमुख घटकपक्षांचे नेते तर भावी मुख्यमंत्री म्हणून आपापल्या पक्षाच्या नेत्यांची नावे घेत आहेत. सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची घाई झाल्याचे दिसून येत असून आघाडीतील बिघाडीचे दर्शन आत्तापासूनच जनतेला घडत आहे. आघाडीतील ही बिघाडी काही आत्ताची नव्हे तर सांगलीच्या जागेवरून मविआमध्ये झालेला वादंग लोकसभेवेळी दिसला आहेच. मविआ मध्ये आलबेल नसताना त्यांच्यावर मतदारांनी विश्वास तरी कसा ठेवायचा असा सवाल उपस्थित केला.

रावसाहेब दानवे पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकार जनहितासाठी झटून काम करत असून विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतक-यांची वीजबिल माफी, लाडकी बहीण, भावांतराप्रमाणे शेतक-यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई देणे हे आणि असे अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले. महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर चहुबाजूंनी टीका करत असलेले मविआचे नेते मात्र त्या त्या मतदारसंघात फलकबाजी करून महायुती सरकारच्या योजनांचे श्रेय लाटण्याचा हीन प्रयत्न करत आहेत. अशी दुटप्पी भूमिका असलेल्या मविआच्या घटक पक्षांपासून सावध रहा आणि सरकारी यंत्रणेतूनच लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरा असे आवाहनही यावेळी केले.

शेवटी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपाच्या पुण्यात रविवारी होणा-या अधिवेशनाला पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते आणि नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देत महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि राज्यात पुन्हा महायुती सरकार आणण्याचा निर्धार कार्यकर्ते या अधिवेशनात करतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *