नवी दिल्लीः प्रतिनिधी
राज्यात शिकाँरा अर्थात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासंदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादीतील चर्चा पूर्ण झाली आहे. या चर्चेची माहिती लवकरच आघाडीतील घटकपक्षांना देण्यात येणार असून त्यानंतर लवकरच पुढील चर्चा शिवसेनेशी करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
नवी दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादीमधील चर्चेची शेवटची फेरी पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे ही त्यांच्यासोबत होते.
महाराष्ट्रात शिकाँराचे सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकमत होणे गरजेचे होते. तसेच या दोन्ही पक्षांमधील सर्व मुद्यांवर चर्चा होणेही आवश्यक होते. त्यानुसार दोन्ही पक्षातील सर्व मुद्यांवर चर्चा पूर्ण झाली असून दोघांमध्ये जवळपास एकमतही झाल्याचे त्यांनी सांगितले.
उद्या मुंबईत सकाळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहिलेल्या समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई-कवाडे गट यांच्याशी चर्चा करून येथील चर्चेची त्यांना माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर शिवसेनेशी काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्यानंतर त्याबाबतची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देणार असल्याचे ते म्हणाले.
Marathi e-Batmya