शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलं घेरलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात पाकिस्तान आहे का या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्र पाकिस्तान आहे की प्रकल्प गुजरातला पळवून लावला. महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे, असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला केला.
आदित्य ठाकरे यांनी आज थोर समाज सुधारक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, झुंजार पत्रकार पणजोबा स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले, आज माझ्या पणजोबांची जयंती आहे आणि मी अभिवादन करायला आलो आहे. माहीममधल्या शिवसैनिकांना भेटलो. माझ्या पणजोबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन देखील आहे. आजच मी पेपरमध्ये वाचलं इथून प्रकल्प तिथे गेला याचं कोणाला दुःख नाही आहे याची मला खंत वाटतेय, असंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी सरकारने लावलेल्या चौकशीवर भाष्य केलं. महाराष्ट्रासाठी कोणी काही बोलायला लागलं की त्याच्यावर आरोप करायचे, त्याची बदनामी करायची त्याची चौकशी मागायची म्हणजे महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं हा आपल्या देशात गुन्हा झालाय का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसंच पुढे म्हणाले, चौकशी कोणाची करणार? केंद्राची करणार की अग्रवाल यांची करणार? असे प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला कोंडीत पकडलं.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, घटनाबाह्य सरकार आल्यानंतर दोन चार घटना घडल्या. २६ जुलैला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की वेदांता येणार आहे, ४ लाख कोटी घेऊन येणार आहेत. MIDC च्या मॅगझीनमध्ये सांगितलं की एक लाख कोटी घेऊन येणार आहेत. अजून एक गोष्ट समोर आली आहे की २९ ऑगस्टला उपमुख्यमंत्री आणि अनिल अगरवाल यांची भेट झाली. ही भेट लहान भावाला प्रकल्प देण्यासाठी झाली का? असा गंभीर सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
Marathi e-Batmya