मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ सुटण्याची शक्यता दिसत असताना शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा दाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप पाठिंब्याचे पत्र दिले नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा आणखी काही दिवस चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे करण्यात आला असून आणखी दोन दिवसाचा अवधी देण्यास राज्यपालांनी नकार दिल्याची माहिती शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी दिली.
राज्यपालांना दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडून राजभवनावर राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजभवनावर पाठिंब्याचे अधिकृत फँक्स करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र या दोन्ही पक्षांकडून पाठिंब्याची पत्रे राजभवनावर पाठविण्यात आली नसल्याने शिवसेनेची अडचण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर आदीत्य ठाकरे म्हणाले की, आम्ही सत्ता स्थापनेचा केलेला दावा राज्यपालांनी अमान्य केला नाही. मात्र यासाठी दोन दिवसांची मागितलेली मुदत देण्यास राज्यपालांनी असमर्थता दर्शविली आहे.
भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पाठिंब्याच्या पत्राची प्रत घेवून राज्यपालांना सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Marathi e-Batmya