भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन येत्या शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय समारंभ मंत्रालय, मुंबई येथे पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता राष्ट्रध्वजारोहण केले जाईल. पुण्यातील कार्यक्रमात राज्यपाल ध्वजारोहण करतील. जिल्हा मुख्यालयांवर मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हानिहाय पालकमंत्र्यांकडून ध्वजारोहण
ठाणे – एकनाथ शिंदे, बीड – अजित पवार, नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील, गोंदिया – छगन भुजबळ, सांगली – चंद्रकांत (दादा) पाटील, नाशिक – गिरीश महाजन, पालघर – गणेश नाईक, जळगाव – गुलाबराव पाटील, अमरावती – दादाजी भुसे, यवतमाळ – संजय राठोड, रत्नागिरी – उदय सामंत, धुळे – जयकुमार रावल, जालना – पंकजा मुंडे, नांदेड – अतुल सावे, चंद्रपूर – डॉ. अशोक वुईके, सातारा – शंभुराज देसाई, मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार, वाशिम – दत्तात्रय भरणे, रायगड – कु. आदिती तटकरे, लातूर – शिवेंद्रसिंह भोसले, नंदुरबार – ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूर – जयकुमार गोरे, हिंगोली – नरहरी झिरवाळ, भंडारा – संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट, धाराशिव – प्रताप सरनाईक, बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील), सिंधुदुर्ग – नितेश राणे, अकोला – आकाश फुंडकर, कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, गडचिरोली – ॲड. आशिष जयस्वाल, वर्धा – डॉ. पंकज भोयर, परभणी – मेघना साकोरे-बोर्डीकर.
दरम्यान, रायगड मध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोन मंत्री आहेत. या दोन मंत्र्यांनी पैकी नेहमी ध्वजारोहणाची संधी आदिती तटकरे यांना देण्यात आलेली आहे. मात्र यंदाच्या वर्षी भरत गोगावले यांना मिळेल अशी शक्यता वाटत असताना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्याची संधी आदिती तटकरे यांनाच देण्यात आली आहे. तर नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय अनिर्णयित आहे. मात्र या जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपाच्या गिरिष महाजन यांच्याकडे आहे. मात्र तेथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सोपवावे अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु, यंदाही स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहनाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार आहे.
त्यामुळे पालकमंत्री पद नसल्याने भरत गोगावले, मंगलप्रभात लोढा, बाबासो पाटील आदी मंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी नसल्याने त्यांना ध्वजारोहन करण्याची संधी राहणार नाही.
पालकमंत्री अनुपस्थित असल्यास…
पालकमंत्री निश्चित नसल्यास किंवा अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत, तर विभागीय मुख्यालयात विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तसेच कोकण भवनातील ध्वजारोहण कोकण विभागीय आयुक्त करतील, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Marathi e-Batmya