जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजिक परधाडे येथील रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले.
अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली, तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहचले असून पोलिस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी अपघाताची माहिती घेऊन प्रशासनाला मदतकार्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले आहेत.
जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयातून बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मदतकार्य रात्रीही सुरु राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहचली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Marathi e-Batmya