लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूका पार पडून त्यातून निवडूण आलेले सरकारही स्थानापन्न झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटातील नेत्यांना भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सातत्याने त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी विविधस्तरावरून कशा ऑफर देण्यात येत होत्या याची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
तत्पूर्वी मागील काही दिवसांपासून कोकणातील माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याचे आणि वेगळा निर्णय घेणार असल्याचे सांगत शिवसेना उबाठाला अखेरचा जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे राजन साळवी यांनी आज शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत कार्यकर्त्यांच्या भावना आणि त्यांच्या भावना कळविल्या. दरम्यान वेगळा निर्णय घेण्याच्या मुद्यावर राजन साळवी ठाम असल्याचे बोलले जात आहे.
मात्र या प्रकरणावर शिवसेना उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते शिवसेना सोडणार नसल्याचे सांगत लोकसभा निवडणूकीनंतर मला आणि राजन साळवी यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून अनेक ऑफर देण्यात आल्या होत्या असा गौप्यस्फोटही यावेळी केला.
पुढे बोलताना वैभव नाईक म्हणाले की, गेली १५ वर्षे राजन साळवी हे शिवसेना उबाठाचे काम करत आहेत. तसेच ते आमदार म्हणूनही काम करत आहेत. मला खात्री आहे की पक्षाच्या अडचणीच्या काळात ते पक्ष सोडणार नाही. जर राजन साळवी यांच्या विरोधात वरिष्ठांनी काम केलं असेल तर उद्धव ठाकरे नक्कीच त्या वरिष्ठावर कारवाई करतील. राजन साळवी यांना आज जो निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जो मान-सन्मान मिळत आहे. तो दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर मिळणार नाही. त्यामुळे राजन साळवी हे पक्ष सोडतील असे वाटत नसल्याचेही यावेळी सांगितले.
तसेच वैभव नाईक पुढे बोलताना म्हणाले की, आमच्यासमोर अनेक अडचणी आहेत. त्या अडचणींवर मात करत आहोत. आम्ही लोकांबरोबर निष्ठावांनाबरोबर राहिलो . लोकसभा निवडणूकीनंतर मला आणि राजन साळवी यांना शिवसेना शिंदे पक्षाकडून ऑफर देण्यात आली होती. मात्र आम्ही शिवसेना उबाठा गटासोबत राहणार असून यापुढेही शिवसेना उबाठाचे म्हणूनच काम करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya