केंद्रीय मंत्री मांडवीय यांचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले, आणखी एक प्रकल्प गेला शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटच्या आधारे केली माहिती उघड

राज्यातील दिड लाख कोटी रूपयांचा वेदांत फॉक्सकॉन हा सेमिकंडक्टर बनविण्याचा आणि लाखभर तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग गुजरातला गेला. त्यापाठोपाठ बल्क ड्रग प्रकल्पही राज्याबाहेर गेला. या दोन प्रकल्पावरून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच महाराष्ट्रातून आणखी एक मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे वास्तव शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटच्या सहाय्याने उघडकीस आणले आहे.

महाराष्ट्रात येणारा मेडिसीन डिव्हाइस पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची कल्पना सत्ताधारी पक्षाला आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत विचारत शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, वेदान्त-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिव्हाइस पार्क योजनेलाही मुकावं लागलं आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच वडगाव-मावळ परिसरात जनआक्रोश मोर्चा काढला होता. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने लाखभर लोकांचा रोजगारही गुजरातला गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याची घटना ताजी असताना आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानं महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत राज्यसभेत मेडिकल डिव्हाईस प्रकल्पाच्या अनुषंगाने यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यास केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सप्टेंबर अर्थात या चालु महिन्यात पत्र पाठवित उत्तर दिले. तसेच हा उद्योग उत्तर प्रदेश, तामीळनाडू या राज्यांना देण्यात आल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *