मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उमेदवारांना पुढील राजकिय भवितव्य लक्षात घेवून अनेक सामाजिक संघटनांमध्ये पाठिंबा देण्याची चढाओढ लागली. मात्र विरोधकांना डावलत सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मुक मोर्चे काढले. परंतु पक्ष न पाहता फक्त मराठा समाजाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी घेतली. मात्र या निर्णयाला काही जणांनी विरोध केल्याने क्रांती मोर्चात फाटाफूट झाल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा आऱक्षणाबाबत राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजप-शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी जाहीर केले होते. परंतु निवडणूकीच्या रणधुमाळीत दोन टप्पे पार पडल्यानंतरही याबाबत कोणत्याच राजकिय पक्षांनी भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे क्रांती मोर्चाकडून कोणत्याही पध्दतीची भूमिका घेण्यात येणार नसल्याची अटकळ अनेकांची होती. परंतु राज्यातील बदलत्या राजकिय परिस्थितीचा अंदाज वेगळाच येवू लागल्याने पक्ष कोणताही असो फक्त मराठा उमेदवारांनाच मदत करण्याचा निर्णय क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी घेत तसे जाहीर केले. मात्र हा निर्णय राजकियदृष्ट्या नुकसानदायक असल्याचे मत काहींनी घेतल्याचे क्रांती मोर्चाच्या अनेक संयोजकांपैकी एकाने सांगितले.
त्यामुळे क्रांती मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्यांनी संयोजकाच्या निर्णयासोबत जाण्याऐवजी स्वतंत्रपणे जाण्याचा निर्णय घेतला. तसेच स्थानिक पातळीवरची राजकिय परिस्थिती लक्षात घेवून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ज्या ठिकाणी मराठा उमेदवार विरूध्द मराठेतर उमेदवार आहे. त्या ठिकाणी फक्त मराठा उमेदवाराला तर ज्या ठिकाणी मराठा उमेदवार विरूध्द मराठा असेल त्या ठिकाणी कोणालाही पाठिंबा द्यायचा नाही असे धोरणही स्विकारण्यात आल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
Marathi e-Batmya