प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूवरून विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग काँग्रेसच्या सदस्यांनी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी घेरले

गडचिरोली जिल्ह्यातील दोन आणि अकोला जिल्ह्यातील एक अशा तीन महिलांचे योग्य व वेळीच उपचार न मिळाल्याने प्रसूति दरम्यान मृत्यू झाल्यामुळे आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात प्रचंड गदारोळ झाला.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सर्व विरोधी सदस्यांनी निषेध करीत सभात्याग केला.

विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान आरोग्य विभागाशी संबधित प्रश्नावर चर्चा सुरु झाली. त्यावेळी काँग्रेस सदस्या वर्षा गायकवाड यांनी गर्भवती तरुण महिलांचे मृत्यू ही गंभीर बाब आहे. आरोग्य व्यवस्थान महत्वाचे माना प्राथमिकता ठरवा अशी मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य राजेंद्र शिंगणे यांनी गंभीर स्थितीत असलेल्या महिलेला तीन ठिकाणी का फिरवले असा उपप्रश्न विचारताना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलला भेट द्या अशी सुचना केली.

सुभाष धोटे यांनी गडचिरोली येथील दोषी डॉक्टरांवर कारवाई करणार का असा सवाल केला तर संजय गायकवाड यांनी मृत्यूचे तांडव जिल्हा रुग्णालयात सुरू असताना चोरांच्या हाती चौकशी कशी देता असा सवाल केला.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पेशन्टचा फूटबॉल का करता असा सवाल करत आरोग्य यंत्रणेचा खेळखंडोबा केल्यानंतरही आरोग्य मंत्री गंभीर नसल्याबाबचा सवाल केला. भाजपा सदस्य योगेश सागर यांनी सकाळी सात वाजता दाखल केलेल्या महिला रुग्णास दुपारी एक वाजता अकोला येथे का पाठवले यात डॉक्टरांचाच हलगर्जीपणा दिसतो जबाबदारी निश्चित करुन ताबडतोब कारवाई करा अशी मागणी केली.

विरोधकांच्या प्रश्नांच्या सततच्या भडिमाराला उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे एसईएस मार्फत चौकशी करू असे वारंवार उत्तर देत होते. अखेर पुढील अधिवेशनापर्यंत अहवाल मागवू असे उत्तर येताच विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे संतप्त होत म्हणाले, हे काय चाललंय राज्यात? निष्पाप महिलांचे मृत्यू होत आहेत, तात्काळ आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत सर्व विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.

 

About Editor

Check Also

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *