आशिष शेलार यांची मागणी, मुंबईपालिका आयुक्तांनी नाल्यावर येऊन पहावं

मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामात निष्काळजीपणा दाखवत आहे. त्यामुळे पालिकेने ७५ टक्के नालेसफाई कामांबाबत केलेले दावे हे खोटे व रतन खत्रीचे आकडे आहेत. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी नाल्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले. नालेसफाईच्या कामाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशीही मागणी यावेळी केली.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील गझधर बांध जंक्शन, साऊथ अ‍ॅव्हेन्यू, नाँर्थ अ‍ॅव्हेन्यू, एसएनडीटी नाला येथील नालेसफाई कामाची पाहणी केली. अद्याप समाधानकारक कामे झालेली नाहीत हे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

अडीशे कोटींच्यावर खर्च पण परिस्थिती वेगळी

भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड.आशिष शेलार म्हणाले,मुंबई शहरात मोठे छोटे अरुंद असे नाले दोन हजार किलोमीटर पर्यंतचे आहेत. नालेसफाईला गेल्यावर्षीच्या अनुभवाच्या आधारे अडीशे कोटींच्यावर खर्च होतो पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते? अडीशे कोटी रुपये त्यापेक्षा जास्त खर्च होऊन २ हजार किलोमीटरच्या नाल्यांची सफाई समाधानकारक नसते. आज मी स्वतः प्रत्यक्षपाहणी केली आहे. ज्या पद्धतीचा कामाचा प्रतिसाद दिसता पावसाळापूर्वी संपूर्ण नालेसफाई होईल हे अशक्यप्राय वाटत आहे. महापालिका आयुक्त आपण नाल्यावर या, नालेसफाईच्या कामाच्या भेटीचे चित्र दिसू द्या, अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या पद्धतीचे आकडे फेकले जात आहेत ते पाहता नाल्यांची ७५ टक्के सफाई झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात काल मुंबईच्या मतदारांनी दिलेला प्रतिसाद ५२ टक्के आहे म्हणून टक्केवारीवर बोलायचे झाले असल्यास चाळीस-पंचेचाळीसच्या वर नालेसफाई झाल्याचे दिसत नाही.

नालेसफाई आकडे म्हणजे रतन खत्रीचे आकडे

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, जुन्या काळात रतन खत्रीचे आकडे होते तसे महापालिकेचे आकडे आहेत. २ लाख ७३ हजार मॅट्रिक टन गाळ कुठे टाकला, व्हिडिओ दाखवा? क्षेपणभूमी कुठे आहे? सर्टिफिकेट दाखवा, जिथून गाळ काढला त्या भागातल्या आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेतली का? कंत्राटदारांनी दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडला. त्याच्यामध्ये तेरी मेरी मिली चूप या पद्धतीचा प्रकार आहे अशीही टीका त्यांनी केली.

२५ वर्षात काम नीट झाले नाही…

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या २५ वर्षात उद्धवजींनी काम नीट केले असते तर ही परिस्थिती झाली नसती. उद्धवजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्याचे गाळ मोजण्याचे परिमाण होते ते अजब होते. अजब तुझे सरकार उद्धवा अशी स्थिती होती. नाला शंभर टक्के साफ करायचा नाही हा नियम उद्धव ठाकरे यांच्या काळात होता. नाल्यातील गाळ मोजण्याची प्रक्रिया किती, त्याचे परिमाण उद्धवजींच्या काळात वेगळे होते. गाळ काढायचा तर पावसानंतरसुद्धा तसेच पावसाळी किती टक्के याची टक्केवारी सुद्धा ठरली होती. त्यामुळे नवीन मापदंड नाल्याच्या कचऱ्याचे मोजमाप करणारा, साफसफाईचा परिमाण ठरवणारा नवा मापदंड करावे लागेल ते काम आम्हाला करावे लागेल तशीही मागणी आम्ही करत असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे आवाहन, पराभवाने खचून जाऊ नका, मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांबरोबर वर्षा गायकवाड यांची राजीव गांधी भवनमध्ये बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व दबावाला बळी न पडता लढा दिला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *