मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात दुष्काळाची परिस्थिती वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र राज्य सरकार अजून अंग झटकून कामाला लागल्याचे दिसून येत नाही. या दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पहात राहणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा गंभीर इशारा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.
शरद पवार यांनी वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे पुन्हा एकदा राज्य सरकारचे लक्ष वेधले.
यावेळी शरद पवार आपल्या पत्रात म्हणाले की, मागील १० दिवसात राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भआला देखील बसत आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळंगाव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाड्यासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगांव आणि सांगली जिल्ह्यातील जत आटपाटी, ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.
पुढे शरद पवार म्हणाले की, मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टॅकर्स होते. आजमितीसती संख्या ११ हजाराच्या वर गेली असून टॅकर्ससाठी पाणी भरण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी पळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्य शासनाने अद्याप फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारण्याच्या योजना तळागळापर्यंत पोहचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते.
शेवटी शरद पवार म्हणाले की, गदुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भूमिका घेत आलो आहे. पंरतू दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे. दुष्काळ निवारण्याच्या कामात राज्य सरकारने काही तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल हे स्पष्टपणे नमूद करतो असा शब्दात स्पष्ट इशारा दिला.
https://x.com/PawarSpeaks/status/1797535804526596569