मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाचा उद्रेक कमी होताच विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. सप्टेंबरमध्ये देशात सुमारे ७०.६६ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत ही आकडेवारी ७९ टक्के अधिक आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ३९.४३ लोकांनी हवाई प्रवास केला होता. नागरी उड्डान महासंचालनालयाने (डीजीसीए) ही आकडेवारी जाहीर केली आहे.
डीजीसीएच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये ६७.०१ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला होता. तर जुलैमध्ये ५०.०७ लाख, जूनमध्ये ३१.१३ लाख, मेमध्ये २१.१५ लाख आणि एप्रिलमध्ये ५७.२५ लाख लोकांनी हवाई प्रवास केला आहे.
सप्टेंबर महिन्यात इंडिगो एअरलाईन्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. सप्टेंबरमध्ये इंडिगोने ३९.६९ लाख प्रवाशांनी प्रवास केला. म्हणजे इंडिगोच्या प्रवाशांची संख्या ५६.२ टक्के आहे. स्पाइसजेटने या महिन्य़ात ६.०२ लाख प्रवाशांनी प्रवास केला. या काळात स्पाइसजेटचा बाजार हिस्सा ८.५ टक्के होता. सप्टेंबरमध्ये ८.५३ लाख लोकांनी एअर इंडिया, ५.८ लाख लोकांनी गो फर्स्ट, ६.१२ लाख लोकांनी विस्तारा आणि ४.१३ लाख लोकांनी एयर एशिया इंडियाच्या विमानांनी प्रवास केला.
वक्तशीरपणाच्या बाबतीतही इंडिगो अव्वल राहिली आहे. सप्टेंबरमध्ये बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबई या चार विमानतळांवर इंडिगोची विमाने ९५.५ टक्के वेळेवर पोहोचली आहेत. तर एअर एशिया इंडिया आणि गो फर्स्ट या चार विमानतळांवर अनुक्रमे ९५.१ टक्के आणि ९४.४ टक्के सह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
देशातील विमान कंपन्यांनी १८ ऑक्टोबरपासून १०० टक्के प्रवासी क्षमतेसह उड्डाण सुरू केले आहे. याआधी विमान कंपन्या त्यांच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ ८५ टक्के देशांतर्गत सेवांमध्ये कार्यरत होत्या. कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे फ्लाइटवरील क्षमता मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने विमान कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून सर्व जागांसाठी तिकीट बुक करण्याची परवानगी दिली आहे.
हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना सवलत देताना त्यांना आणि प्रवाशांना कोविडशी संबंधित नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये, विमान कंपन्यांना देशांतर्गत उड्डाणांमध्ये ७२.५ टक्के ऐवजी ८५ टक्के जागा बुक करण्याची परवानगी दिली. यापूर्वी जुलैमध्ये तिकिटे ५० टक्के ऐवजी ६५ टक्के जागा बुक करण्याची परवानगी होती. कोविड १९ रोखण्यासाठी सरकारने २३ मार्च २०२० रोजी परदेशी उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घातली होती. पण गेल्या वर्षी मे पासून ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली आहे.
Marathi e-Batmya