गणेश विसर्जनानंतर स्काऊटचे विद्यार्थी आणि मनसेने केली चौपाट्यांची स्वच्छता दादर, गिरगावंसह अनेक चौपाट्या झाल्या स्वच्छ

गणेश विर्सजन झाल्या नंतर गिरगांव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्मल्यांची व इतर कचऱ्याची स्वच्छता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे ४०० सभासद एन.सी.सी. मधील १५०० मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण सुमारे दोन हजार सभासद सहभागी झाले होते. त्याचबरोबर मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीही अनेक मनसे कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदविला.

गणपती विसर्जनानंतर कचरा जमा होतो. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचे चित्र निर्माण होते. त्यामुळे युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेचे एन. बी. मोटे राज्य चिटणीस (अ.का.) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण मुलांचा ओढा इंटरनेट, मोबाईल, टीव्ही यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणमैत्री, समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळविणे याकरिता विविध सेवा प्रकल्पाचे आयोजन स्काऊटस् आणि गाईडस् राज्यसंस्थेच्या वतीने करण्यात येत असते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. अनेक पर्यावरणप्रेमींसह अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे, पक्षाचे उपाध्यक्ष  यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणी हेसुद्धा समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

आज शनिवार सकाळी मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड येथे; तर रत्नागिरीत मांडवी येथे सकाळी ८ ते १० दरम्यान पक्षातर्फे राबवण्यात आलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी, असंख्य नागरिक तसंच विद्यार्थी सहभागी झाले. या सर्वांनी गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपवले.

About Editor

Check Also

डॉ पंकज भोयर यांचे आश्वासन, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक विधानसभेत चर्चेच्या वेळी दिले आश्वासन

मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर-पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *